नीरा नदीपात्रात सोडले पाणी; सात दरवाजे उघडले
परिंचे – वीर (ता. पुरंदर) धरणातून मंगळवारी (दि.30) दुपारी एकूण सात दरवाजे चार फुटांनी उचलले. नीरा पात्रात 32,074 क्युसेक पाणी सोडले आहे. वीर धरणातून येत्या 48 तासांत 1.500 टीएमसी पाणी नीरा नदीपात्रात सोडले आहे. धरणातून होणाऱ्या विसर्गात 27 हजार 556 क्युसेक वाढ झाल्याचे सहायक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिल्याचे शाखा अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले.
वीर धरणाचे आणखी दोन दरवाजे मंगळवारी चार फुटांनी उचलून नदीपात्रात 23,110 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्याने दुपारी दोन वाजता आणखी दोन दरवाजे चार फुटांनी उचलून 32,000 क्युसेक पाणी नीरा पात्रात सोडले. वीर 98.19 टक्के भरले आहे. धरणात 9.635 टीएमसी पाणीसाठा असून पाणी पातळी 579.67 मीटर आहे. नीरा उजव्या कालव्यातून 1500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 दिवस आधी विसर्ग सुरू असल्याचे संभाजी शेडगे यांनी सांगितले.