पिरंगुट – मुळशी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तालुक्याच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवड करून घेतली होती. मात्र, गेल्या दहा ते 12 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेक भागात भात लागवडीची कामे रखडली होती. त्यामुळे बळीराजा अस्वस्थ झाला होता.
मात्र, दमदार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा आनंदात आहे. सध्या सर्वत्र भात लागवडीची कामे सुरू आहेत. पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंद गतीने सुरू होती. धरण भागातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुळशी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे.