जळोची – बारामती शहरातील ओला कचराप्रश्न नगरपालिकेकडून मार्गी लावण्यात आला आहे. नगरपालिकेने बंद पडलेला बायोगॅस प्रकल्प नुकतच सुरू केला असून त्याची वीज क्षमता वाढली आहे. त्यामुळे शहरातील 143 पथदिवे “लखलखणार’ असल्याने लाखो रुपयांच्या वीज बिलात बचत होणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बारामती शहरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी राज्य शासनाने विकास आराखड्यात कचराप्रश्न मार्गी लावण्यासाठी 12 कोटी 82 लाख 02 हजार रुपयांच्या विकास नुकतीच मंजुरी दिली आहे. यामध्ये वर्गीकरण व ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. पहिल्या बायोगॅस प्रकल्पामध्ये पाच टन कचरा जात आहे. तर पुन्हा नवीन दुसरा प्रकल्प प्रस्तापीत करण्यात आला आहे. मात्र, पूर्वीचा पाच टन क्षमतेचा प्रकल्प 24 लाख 50 हजार रुपये खर्च करून सुरू केला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्याने कऱ्हा नदीतील पडणारा कचरा बंद झाला आहे. तर नवीन उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची पाच टनाची कचऱ्याची क्षमता आहे. त्यामुळे सहा टन कचरा कंपोस्टसाठी वापरण्यात येणार आहे.
त्यामुळे बारामती नगरपरिषदेच्या 54.09 किमी मध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या 16 टन ओल्या कचऱ्याचा प्रश्न मार्गील लागणार आहे. बायोगॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस वीजनिर्मितीसाठी वापरला जातो. प्रत्येक दिवशी पाच टनापासून 300 क्युबिक मीटर बायोगॅस तयार होणार आहे. 15 तासाला 40 किलोवॅट वीज तयार होते. त्यामुळे वार्षिक लाखो रुपयांच्या वीज बिलात बचत होणार असल्याचे प्रशासनाने माहिती दिली आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा पथदिव्यांसाठी वापर होणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेची मोठी आर्थिक बचत होणार आहे.
– योगेश कडूसकर, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद