मुंबई : सरपंचांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने अलिकडेच घेतला होता. त्याचा फायदा आता सरकारला होणार असल्याचे दिसत आहे. कारण सरपंचांची मोठी ताकद सरकारच्या म्हणजेच भाजपच्या पाठीशी उभी असणार आहे. याचेच शक्तिप्रदर्शन येत्या 31 जुलै रोजी शिर्डीत करण्यात येणार आहे. त्या दिवशी राज्यातील 40 हजार सरपंच, उपसरपंचांचा जंगी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे अन्य काही मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
पूर्वी सरपंचांना एक हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळत असे. अलिकडेच फडणवीस सरकारने हे मानधन पाच हजार रुपये केले. 31 तारखेच्या मेळाव्यात राज्य सरपंच परिषदेच्या वतीने या बाबत सरकारचे आभार मानण्यासाठी फडणवीस आणि मुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. एकीकडे शिवसेनेने पीक विम्याच्या प्रश्नाला हात घालून शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केले असताना दुसरीकडे भाजपने राज्यातील सरपंचांना मानधनवाढ आणि मेळाव्याच्या निमित्ताने गोंजारले आहे. यापूर्वी 2003 मध्ये सरपंचांचा राज्यव्यापी मेळावा झाला होता. आता तब्बल 16 वर्षांनंतर असा मेळावा होत आहे.