दीड महिन्यात जिहे-कटापूर योजनेचे पाणी तालुक्यात येणार
खटाव – विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार या नावातच मोठी ताकद आहे. याची पोच पावती म्हणजेच जिहे-कठापूरच्या योजनेला राज्यशासन व केंद्रशासनाकडून मिळालेली मंजुरी होय. त्यांच्या पुण्याईने येत्या दीड महिन्यात या योजनेचे पाणी तालुक्यात येणार आहे, असा विश्वास गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टचे कार्याध्यक्ष व भाजप युवा नेते महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
खटाव येथे सहकार भारतीचे संस्थापक व प्रणेते लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात इनामदार यांच्या तैलचित्राच्या अनावरण उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, ट्रस्ट अध्यक्ष विनोद इनामदार, रणधिर जाधव, युवा नेते राहुल पाटील, श्रीनीवास मुळे, भरत मुळे, धनंजय इनामदार, प्रमोद इनामदार, उमेश भिसे, शेखर देशमुख, अभिजीत देशमुख, संतोष वायदंडे, क्षीतिज गुंजवटे, शरद बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महेश शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे जिहे-कटापूरचे पाणी खटाव तालुक्यात दीडच महिन्यात खळाळणार आहे. लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट हे गुरुवर्यांच्या विचाराने प्रेरित होऊन व राष्ट्रप्रेमाची ज्योत हाती घेऊन अखिल समाजाचा विकासाच्या ध्यासाने काम करत आहे.
ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी राज्य व केंद्रशासनाकडे योजनेच्या मंजुरीसाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र अलिकडे विविध पक्षातील नेतेमंडळी या योजनेबद्दल अनेक वल्गना करून श्रेय लाटण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीही खटाव ग्रामपंचायत कार्यालयास भेट देत जिहे-कटापूर योजनेचे काम अत्यंत प्रगती पथावर असल्याचे व येत्या नोव्हेंबरपर्यंत खटाव परिसर पाणीदार होणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुहास जोशी यांनी केले. सरपंच वायदंडे, विनोद इनादार व विनय भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत खटावचे सर्व सदस्य, युवा वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय टकले यांनी आभार मानले.