मुंबई : थेट जनतेतून मंत्री आणि आमदाराप्रमाणे निवडूण आलेले सरपंचदेखील आता आपल्या पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. याविषयी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी माहिती दिली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांची गावाबाबत असलेली बांधिलकी आणि जबाबदारी या शपथेच्या माध्यमातून वेळोवेळी जाणीव व्हावी, तसेच याविषयी गावातील जनता आणि लोकप्रतिनिधींमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे पंकजा मुंढे यांनी म्हटले. राज्य निवडणुक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने जो प्रस्ताव तयार केला त्याला मान्यता देण्यात आली आहे.
प्रधान सचिव आणि ग्रामविकास यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना गोपनियतेची शपथ देण्यासंबंधी परिपत्रक निर्गमित करण्याच्या सूचना नुकत्याच दिल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलमांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला अधिकारी पहिल्या सभेचा अध्यक्ष असेल. पहिल्या सभेचे कामकाज सुरू होण्यापुर्वी अध्यासी अधिकारी जनतेतून निवडूण सरपंच यांना गोपनियतेची शपथ देतील तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम 1964 चा अवलंब करून कार्यवाही सुरू करतील.