उद्धव ठाकरेंचे सीमावासियांना आश्वासन
मुंबई – शिवसेना सीमावासियांच्या कायम पाठिशी आहे. सीमावासियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शिवसेनेचे खासदार लोकसभेत आवाज उठवतील. वेळप्रसंगी शिवसेनेचे खासदार पंतप्रधानांची भेटही घेतील, असे स्पष्ट आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सीमावासियांना दिले.
सीमाभागातील बेळगाव, कारवार, निपाणी आदी भागात कानडी सरकारकडून सीमावासियांवर होणारा अत्याचार थांबावा तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. न्यायालयात हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी सीमावासियांच्या एका शिष्टमंडळाने आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर यांनी केले. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
कर्नाटकात शिवसेनेला कोणतीही निवडणूक लढवायची नाही किंवा सत्तेची साठमारी करायची नाही. शिवसेना आणि सीमावासीय हे नातं राजकीय नाही. शिवसेना सीमावासीयांच्या हृदयात आहे. त्यामुळेच इथे कोणतीही शाखा नसतानाही सीमाभागात “शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा घुमतात, असे सांगतानाच , बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी न्यायालयात या प्रकरणावर निर्णय होईल तोपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासित घोषित करायलाच हवा.
यासंदर्भात शिवसेनेचे खासदार लोकसभेत सीमावासीयांची बाजू उचलून धरतील. त्याचप्रमाणे सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करून सीमावासीयांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेता येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपने सीमावासीयांना न्याय द्यावा
कर्नाटकात भाजपच्या सत्तास्थापननेच्या हालचाली सुरू आहेत. पण कर्नाटकात सत्तेवर येणारे सरकार हे केवळ सत्तेसाठी नसावे तर सीमावासीयांना न्याय देणारे सरकार असावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठीलढा अधिक तीव्र करावा लागेल. लढा तीव्र केल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
तरुण पिढीलाही या लढ्यात सामील करून घ्या, असे सांगतानाच सीमाभागात होणाऱ्या कानडी जुलूमशाहीविरोधात महाराष्ट्रातील जनताही आवाज उठवेल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.