वर्धा : बहिणीशी प्रेमप्रकरण केल्यामुळे भावाने तरुणाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्ध्याच्या पुलगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्याने जातान अंधारात दोन बाईकस्वारांनी तरुणावर चाकूने वार करत पळ काढला. पण पोलिसांच्या शोध पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. जयकुमार वाणी असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
जयकुमारचे अक्षय माहुरे या मित्राच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. ही बाब अक्षयला समजताच त्याला राग अनावर झाला आणि त्याने जयकुमारची हत्या केली. अक्षयने त्याचा मित्र आशिष लोणकरसोबत जयकुमारला मारण्याचा कट रचला. त्यानंतर जयकुमारला रात्री उशिरा रस्त्याने जात असतान गाठले आणि त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. अक्षयने त्याच्या मित्रासोबत जयकुमारवर इतका जोरात हल्ला केला की त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ला झाल्यानंतर अक्षय आणि त्याच्या मित्राने पळ काढला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.