चाकण – नेहमीची येतो पावसाळा आणि तुंबून टाकतो चाकण-तळेगाव चौकातील सेवा रस्ता असे जणू समीकरण झाले आहे. चाकणमधील सेवा रस्त्यांचा नेमका उपयोग काय हा प्रश्न आता आ वासून उभा आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी सेवा रस्त्याच्याकडेला असणारी गटारे साफ करून प्रवाहित करणे गरजेचे असताना संबंधित विभागाकडून काहीच काम होत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी टोलनाका पासून पुढे चिंबळी, कुरुळी, चाकण ते राजगुरुनगरपर्यंत सेवा (सर्व्हिस) रस्ते करणे आवश्यक असताना फक्त चाकणचा काही भाग वगळता सेवा रस्ते केले नसल्याने किरकोळ, गंभीर अपघात, वाहतूककोंडी याचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत विविध संघटनाकडून वेळोवेळी आंदोलनेही झाली मात्र, प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी त्याकडे अजूनही गांभीर्याने पहिले नाही व दखलही घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच चाकण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव चौक व आंबेठाण चौका पुढील उड्डाण पूल हे योग्य त्या ठिकाणी उभारले गेले नसल्याचा हा एकच मुद्दा नेहमीच चर्चिला जात असून पुणे-नशिक महामार्गावर असणाऱ्या दोन्ही उड्डाणपूलामुळे चाकणकरांसह प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा मनस्ताप नित्याचाच झाला आहे. तळेगाव-महाळूंगे-खराबवाडीमार्गे चाकण भागातून वळविण्यात येणारी अवजड वाहतूकमुळे चाकणमध्ये वाहतुकीने हैराण व्हावे लागत असल्याने अतिरिक्त रहदारी वाढल्यास याभागात वाहतुकीचा कसा फज्जा उडतो याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून आला आहे.