वाई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाई तालुक्यातील केंजळगडाला अवकळा प्राप्त झाली होती. मात्र ही अवकळा घालवण्यासाठी गडाची स्वच्छता अन् संवर्धनासाठी अखेर “सह्याद्री’च धावून आला. वाई परिसरातील किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन व्हावे यासाठी तरुणांसह ज्येष्ठांनी मिळून सह्याद्री परिवार स्थापन केला आहे. आणि या परिवाराच्या माध्यमातून वाई तालुक्यासह इतरही किल्ल्याचे संवर्धन आणि स्वच्छता करण्याचा विडा उचलण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या केंजळ गडावरील ऐतिहासिक तळ्यांची दुरुस्ती, गडावरील परिसराची स्वच्छता, तसेच गडावर जाण्यासाठी रस्ता तयार करून सह्याद्री परिवाराने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. एक मे रोजी किल्ले अजिंक्यतारा येथे झालेल्या सातारा जिल्ह्याच्या पहिल्या दुर्ग परिषदेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक किल्ल्यावर दुर्ग संवर्धनाची चळवळ उभी झाली पाहिजे असा निर्धार करण्यात आला. “गडकोट हेच स्वराज्य, भटकंती सह्याद्रीचा परिवार’ तसेच वाई परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सह्याद्री परिवाराने किल्ले केंजळगड येथे पहिली संवर्धन मोहीम हाती घेतली.
सर्वप्रथम मोहिमेतील सदस्यांनी गडदेवता केंजळाई देवीचे पूजन करून मोहिमेस प्रारंभ केला. केंजळगडाचे दोन भग्न प्रवेशद्वार पार केल्यावर आपल्याला उजव्या बाजूला गुहा दिसते. या गुहेपासून पुढे गेल्यावर पाण्याची टाक्या आहेत. पूर्वीच्या काळी प्रामुख्याने या टाक्यांचा उपयोग हा गडावर दमून येणाऱ्या लोकांसाठी पाणी पिण्यास होत असावा. तसेच पहाऱ्यावरील मावळे सुद्धा टाक्यांचा वापर करीत असावेत. तसेच किल्ल्याच्या वरील भागातील तटबंदीची दगडी कोसळून या टाक्या कित्येक वर्षे दगड मातीने भरल्या होत्या.
परिवारातील सदस्यांनी या टाक्यातील साचलेला मातीचा गाळ, बारीक-मोठाली दगडी, टिकाव, खोरे, घमेलेच्या साहाय्याने बाहेर काढून टाक्या स्वच्छ केल्या. परिवारातील सदस्यांनी अत्यंत मेहनतीने हे टाक्यांचे संवर्धन केले. पुढे लवकरच गुहेचेसुध्दा संवर्धन हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत परिवारातील अनिल वाशिवले, सौरभ जाधव, अजय वाशिवले, प्रवीण कदम, सिद्धेश सूर्यवंशी, शुभम चव्हाण, गणेश वाशिवले, प्रमोद कदम इत्यादी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.