औरंगाबाद – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचा आदेश यांनी दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी 1991 मध्ये जगमित्र साखर कारखाण्यासाठी 24 एकर जमीन खरेदी केली होती. या खरेदी व्यवहाराविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात राजाभाऊ फड यांनी तक्रार दिली होती. ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे.
गिरी, देशमुख व चव्हाण या तिघांमध्ये जमिनीवरून वाद होता.जमिनीच्या विक्रीचे अधिकार देशमुख व चव्हाण यांना मिळाले होते त्यांच्याकडून मुंडे यांनी ही जमीन खरेदी केली होती. पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून फड यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. ही सरकारी जमीन आहे. त्यामुळे ती ट्रस्ट्र किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असा आक्षेप फड यांनी घेतला होता. त्यामुळे मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. ही विनंती कोर्टाने मान्य केली.
1991मध्ये सरकारी दप्तरात या जमिनीची नोंद इनामी जमीन म्हणून नव्हती. या वादाची आम्हाला माहिती नव्हती. विक्री करण्याचा मालकी हक्क देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली, असे मुंडे यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितले. केवळ राजकीय द्वेषातून आरोप करण्यात आला आहे. असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला असुन या निर्णया विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी या वेळी सांगितले आहे.