जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश
शिरूर – दुष्काळ परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. पाऊस पडेपर्यंत घोड धरणातून औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये 50 टक्के पाणीकपात करा, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लेखी पत्रान्वये मुख्य कार्यकारी अभियंता, औद्योगिक विकास महामंडळ विभागाला दिले आहेत. याबाबतची प्रत उपोषणकर्ते, माजी आमदार अशोक पवार व आमदार बच्चू कडू यांना देण्यात आली आहे. पत्राची प्रत शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी पवार यांच्याकडे पोहोच केली आहे.
पवार यांच्या आंदोलनामुळे शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात निकालात निघाला निघाला आहे. शिरूर तहसीलसमोर माजी आमदार पवार यांनी उपोषण सुरू केले होते. यावेळी तहसीलदार गुरू बिराजदार यांनी मध्यस्थी करून लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर पवार यांनी हे उपोषण मागे घेतले होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावर निर्णय घेऊन 50 टक्के रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील पाण्यात कपात करण्याचे लेखी आदेश दिले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार दिलीप मोहिते, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, दिलीप वाल्हेकर उपस्थित होते.