लखनौ – उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा झालेल्या पराभवाची कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी समीक्षा करणार आहेत. प्रियांका दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त प्रयागराज येथे पोहोचणार आहेत आणि वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. 8 जून रोजी पूर्वांचलमधील पक्षाच्या 40 उमेदवारांची भेट घेत त्यांच्याकडून पराभवाची कारणे जाणून घेतील. या समीक्षेनंतर पक्षात मोठे बदल होऊ शकतात असे बोलले जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळाले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघात पराभूत झाल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे. तर भाजपने 62 आणि सप-बसप आघाडीने 15 जागा जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका यांना उत्तर प्रदेशातील पूर्वांचलची जबाबदारी सोपविली होती.
पूर्वांचलमध्ये मोडणाऱ्या जिल्हयांच्या पक्षाध्यक्षांकडून पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रियांका करतील. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे परंपरागत अमेठी मतदारसंघातच पराभूत झाले. संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना या पराभवाच्या समीक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे सांगितले जाते.