चंद्राबाबू नायडू यांची ‘सुखी:भव’ योजना करून टाकली बंद
नवी दिल्ली – निवडणूक प्रचारकाळात जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डींनी गुरुवारी शेतकऱ्यांसाठी मदत योजनेची घोषणा केली आहे. त्यांनी शेतकऱ्यासाठी ऋतु भरोसा ही नवी योजना जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 12 हजार 500 रुपयांची मदत दिली जाणार आहे.
ही योजना येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आधीच्या चंद्राबाबू नायडू सरकारची अन्नदाता सुखीभव ही योजना बंद केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत मिळत होती. गुरुवारी जगनमोहन रेड्डी यांनी कृषी विभागाची आढावा बैठक घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत मूल्य मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना करणयाच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या. याशिवाय त्यांनी अर्थसंकल्पात मार्केट स्टॅबीलाइझेन फंडासाठी 3 हजार कोटींच्या निधीची देखील घोषणा केली. त्यांनी घेतलेल्या नव्या निर्णयांचे सर्वांकडून स्वागत केले जात आहे.