30 मे पासून बाराव्या विश्वचषक स्पर्धेला सुरवात झाली. जगातील सर्वोत्तम दहा संघांचा समावेश असलेल्या या क्रिकेटच्या कुंभमेळ्यात आशिया खंडातील पाच संघानी सहभाग नोंदविला आहे. आशिया खंडातील या पाच संघांपैकी पाकिस्तान श्रीलंका व अफगाणिस्तान या तीन संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाला तोंड द्यावे लागले असून पाकिस्तानला वेस्ट इंडिजने श्रीलंकेला न्यूझीलंडने तर अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले आहे. तर बांगलादेशने मात्र दक्षिण आफ्रिकेला पराभूत करीत आपल्या विश्वचषक अभियानाची दमदार सुरवात केल्याचे पाहायला मिळाले आहे.
विश्वचषकाला सुरवात होऊन आठवडा उलटला तरी भारतीय संघ अद्याप मैदानावर उतरलेला नसल्याने देशातील क्रिकेट चाहते भारताची पहिली मॅच पाहण्यासाठी आतुर झाले असून क्रिकेट चाहत्यांची हि आतुरता अखेर आज संपणार आहे. गुरुवारी भारत आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करत आपली पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेशी खेळणार आहे.
सलामीचा सामना जिंकून भारत विश्वचषक स्पर्धेमध्ये विजयी सलामी देणार का? याबाबत भारतातील क्रिकेट चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील या मॅचबद्दल क्रिकेट चाहते भरभरुन बोलत आहेत. सोशल मीडियावर तर या मॅच बद्दल कमालीचे बोलले जात आहे ट्विटरवर ङशगरूशपसश हा हॅश टॅग लोकप्रिय होत आहे. नेटिझन्स या हॅशटॅगचा वापर करुन भारताला पाठिंबा देत आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकन संघ भारतावर नेहमीच वरचढ राहिला आहे. दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकात आजवर चार मॅच झाल्या असून त्यातील तीन मॅच दक्षिण आफ्रिकेने तर भारताने केवळ एकच मॅच जिंकली आहे.
1992 सालच्या विश्वचषकात केप्लर वेसेल्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन संघाने अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघास सहा विकेटने पराभूत केले. 1999 साली हंसी क्रोनियेच्या दक्षिण आफ्रिकन संघाने अझरुद्दीनच्या भारतीय संघांला चार विकेटने नमवले. 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतिय संघाने विश्वचषक जिंकला असला तरी भारताला दक्षिण आफ्रिकेकडुन पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी तीन विकेट्सने दक्षिण आफ्रिकेने भारताला नमविले होते. ग्रॅमी स्मिथ त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता 2011 साली भारताला स्वीकारावा लागलेला तो एकमेव पराभव होता. 2015 साली मात्र भारताने हा इतिहास पुसत दक्षिण आफ्रिकेला 130 धावांनी पराभूत केले होते गब्बर शिखर धवनने त्या मॅचमध्ये दमदार शतक झळकवले होते आताही भारतीय संघ त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा क्रिकेटचाहते व्यक्त करीत आहेत. विश्वचषकातील 3-1 हे समीकरण यावेळी 3-2 असे बनेल याबाबत कोणाचाही मनात शंका नाही कारण यावेळी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेपेक्षा बलवान आहे दक्षिण आफ्रिका संघ पूर्वीइतका आता बलवान राहिला नाही फाफ डुप्लिसेसच्या नेतृत्वाखालील हा संघ आपली लय गमावून बसला आहे या विश्वचषकात खेळलेल्या दोन्ही मॅच तो गमावून बसला आहे पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडने त्यांना नमवले तर दुसऱ्या मॅचमध्ये क्रिकेट विश्वात कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने त्यांना धूळ चारली बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिकेचा असा धुव्वा उडेल अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्वीइतकी तगडी नाही कर्णधार फाफ डुप्लिसेस, क्विंटन डिकॉक व डेव्हिड मिलर यांच्यावरच त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. जे पी ड्युमिनी व हाशीम आमला आता अस्ताला चालले आहेत फक्त कर्णधार फाफ डुप्लिसेस हाच फॉर्मात आहे एकेकाळी क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धार आज कमी झाली आहे बांगलादेश सारख्या संघाने त्यांची गोलंदाजी फोडून काढीत 330 धावा फटकावल्या याउलट भारतिय संघ आज तुफान फॉर्मात आहे कर्णधार विराट कोहली इतके सातत्य जगातल्या कोणत्याच फलंदाजाकडे नाही शिखर धवन व रोहित शर्मा हि सलामीची जोडी धावांतील सातत्य टिकवून आहे या तिघांपैकी दोघांनी जरी चांगला खेळ केला तरी भारताचा विजय पक्का आहे के एल राहुल धोनी केदार जाधव हे मोठी खेळी खेळण्यात तरबेज आहेत हार्दिक पांड्या भारतीय संघाचा एक्स फॅक्टर आहे तो भारताला एकहाती मॅच जिंकून देऊ शकतो भारताची गोलंदाजी देखील फॉर्मात आहे बुमरा शमी व भुवनेश्वर हे वेगवान त्रिकुट दक्षिण आफ्रिकन फलंदाजी कापून काढु शकतात कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल हे आफ्रिकन फलंदाजांची फिरकी घेण्यास सक्षम आहेत एकूणच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेपेक्षा कैक पटीने सरस आहे म्हणूनच हि मॅच भारत सहज जिंकेल असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना वाटतो दक्षिण आफ्रिकेला चारीमुंड्याचित करीत भारताने आपल्या विश्वचषक अभियानाची विजयी सुरवात करावी अशीच सदिच्छा क्रिकेट चाहते व्यक्त करीत आहेत.
– श्याम बसप्पा ठाणेदार