नवी दिल्ली – जिथे अमित शहा यांचे नाव येते तेथील सर्व समस्या किंवा आव्हाने लगेच संपुष्ठात येतात असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केले आहे. राय यांनी गृहराज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही प्रतिक्रीया दिली आहे. नित्यानंद राय यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश झाला असून त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांनी त्यांना तुमच्या मंत्रालयापुढील आव्हाने काय आहेत असा प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले. राय हे बिहार प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या खात्याविषयी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. अमित शहा हेच सर्व प्रश्नांना उत्तर आहे असे ते म्हणाले. आपण आपल्या खात्याची जबाबदारी पुर्ण निष्ठेने निभाऊन नेऊ असेही त्यांनी यावेळी नमूद केले.