नवी दिल्ली – महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत दिल्लीतील पहिल्याच खटल्यात सहा जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. या कायद्याअंतर्गत या शहरात पहिल्यांदाच इतक्या आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या सहा जणांवर नोकरीच्या अमिषाने तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
विपीन शर्मा, सचिन शर्मा, हनी शर्मा, हर्षद शर्मा, अमन आलम, आणि भूपिंदरसिंग अशी दोषी ठरवण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.यातील विपीन हा या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यावर दिल्ली, पंजाब, हरियाना या राज्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीच्या विरोधात 19 डिसेंबर 2009 रोजी मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. विदेशात नोकरी लावतो म्हणून त्यांनी अनेक बेरोजगार युवकांना फसवले होते. त्यांच्या जवळून बोगस व्हीसा, बोगस पॅन कार्डे, डेबीट कार्डे आणि सीमकार्डे जप्त करण्यात आली आहेत.
यातील आरोपींपैकी विपीन याला चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला 55 लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अन्य आरोपींना दहा वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 14 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.