3 जूनपर्यंत मुदत : शिक्षक भरतीसाठी 1 लाख 23 हजार उमेदवारांची नोंदणी
पुणे – शासनाच्या पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून येत्या 3 जून रोजी सर्वच उमेदवारांना पुन्हा शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गेली 8 वर्षे शिक्षक भरतीला बंदी घालण्यात आली होती. ही बंदी गेल्या वर्षी उठविण्यात आली. पारदर्शकपणे शिक्षकांची भरती करता यावी यासाठी पवित्र पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर 1 लाख 23 हजार उमेदवारांनी नोंदणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील 12 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत जाहिरातींही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानंतर 22 मे पासून उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी पोर्टलवरील नवीन सर्व्हरवर सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, पोर्टलवर तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. भरतीत कोणत्या ना कोणत्या स्वरुपात विघ्न येऊ लागले आहेत. या संदर्भात उमेदवारांनी थेट शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडेच तक्रारी केल्या. आयुक्तांनी सर्व अडचणी दूर करण्याबाबतचे आश्वासन उमेदवारांना दिले असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. उमेदवारांना अर्ज स्वप्रमाणित करण्याबरोबरच शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, माध्यम, जन्मतारीख, लिंग या माहितीत बदल करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. यासाठी 1 जूनपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी त्या-त्या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात मदत कक्ष पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. खरोखरच बदल करण्याची गरज असलेल्या उमेदवारांनीच या ठिकाणी जाऊन माहितीत बदल करून अर्ज पुन्हा स्वप्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. राज्यभरातील पुणे येथे येणाऱ्या उमेदवारांसाठी आझम कॅम्पसमध्ये मदत केंद्रावरून अर्ज अपडेट करून घेता येणार आहे. या केंद्रावर उमेदवारांची दररोजच गर्दी होऊ लागली असल्याचे चित्रही पहायला मिंळू लागली आहे.
शाळांचा प्राधान्यक्रम सर्वच उमेदवारांना पुन्हा भरावे लागणार आहेत. प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा 3 ते 6 जूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले आहे. अशा उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक व व्यवसायिक पात्रतेनुसार इंग्रजी मध्यमा व्यतिरिक्त मराठी वा तत्सम इतर माध्यमाच्या जागा दिसू शकतील. या उमेदवारांसाठी इयत्ता 10 वी मध्ये मराठी किंवा इतर तत्सम भाषा अनिवार्य आहे. याबाबत बदल करण्याची तांत्रिक सुविधाही लवकरच उपलब्ध होणार आहे.
त्यांनीच माध्यम बदलाची कार्यवाही करावी
नवोदय विद्यालय किंवा अन्य इंग्रजी माध्यमातून शैक्षणिक पात्रता धारण केली असेल आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये डीएड /बीएड मराठी माध्यमातून झालेले असेल त्यांना प्राधान्यक्रम भरल्यानंतर इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या जागा दिसतील. त्यामुळे अनावश्यक माध्यम बदलून घेऊ नये. केवळ ज्यांचे माध्यम चुकले असेल त्यांनीच माध्यम बदलाची कार्यवाही करावी, असा सूचना पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.