प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
पुणे – नगर रस्ता परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि नागरिकांना पुरेल ऐवढे पाणी द्यावे, ही मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उपोषण करण्यात आले. दरम्यान, यावर पाच एमएलडी पाणी वाढविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
खराडी, वडगाव शेरी, लोहगाव, विश्रांतवाडी, चंदननगर, खुळेवाडी, गणेशनगर, तुकाराम नगर, बोराटे वस्ती, थिटे वस्ती आदी भागासाठी यापूर्वी दररोज 63 एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, काही दिवसांपासून हा पाणीपुरवठा कमी करून तो 57 एमएलडी करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण नगररस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही भागात तर तीन दिवसांतून एकदा पाणी येते. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे वांरवार तक्रारी करून, निवेदने देऊनही काही उपयोग झाला नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची एवढी मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.
या पाणीसमस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उमोषण सुरू करण्यात आले. यात माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, ऍड. भैय्यासाहेब जाधव, नगरसेविका सुमन पठारे, संजिला पठारे, राजेंद्र खांदवे, नीता गलांडे, सविता औटी, सदाशिव गायकवाड, डॉ. भाऊसाहेब जाधव आदींनी सहभाग घेतला.
दरम्यान, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी उपोषणस्थळी येऊन निवेदन स्वीकारत उपोषणकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी या भागांसाठी पाणी कपात न करता 60 लाख लिटर पाणी वाढवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मागे घेण्यात आले. दिलेला शब्द प्रशासनाने जर पाळला नाही, तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.