375 कनिष्ठ महाविद्यालय; नगर शहरात सर्वाधिक जागा : आरक्षणांबाबत सरकारकडून सूचना नाहीत
तुकट्या कमी होण्याची चिन्हे
अकरावी प्रवेशासाठी 920 तुकट्यांमध्ये 79 हजार 440 विद्यार्थ्यांची क्षमता आहे.गेल्यावर्षी 73 हजार 287 विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी नोंद केली होती. त्यापैकी 72 हजार 855 विद्यार्थी परीक्षेला बसले तर 65 हजार 787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यावेळी अकरावीचा प्रवेश पूर्ण क्षमतेने झाला होता. परंतू यावेळी तुकट्या वाढलेल्या अन् विद्यार्थी कमी अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. यंदा दहावीच्या परिक्षेत 75 हजार 83 विद्यार्थी परीक्षेला बसले आहे. बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या व क्षमता 79 हजार 440 पाहता 4 हजार 317 जागा रिक्त राहतात. त्यात या बसलेल्या विद्यार्थीपैकी किती विद्यार्थी उत्तीर्ण होणार त्यानुसार क्षमता निश्चित होईल. हे सर्व पाहता यंदा तुकट्या कमी होण्याची चिन्हे आहेत.
नगर – दहावीच्या निकालाची प्रतीक्षा असतांना दुसरीकडे प्रशासनाने अकरावीच्या प्रवेशासाठी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात 375 कनिष्ठ महाविद्यालय असून या महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त या शाखांसाठी 920 तुकट्या असून तब्बल 79 हजार 449 विद्यार्थी क्षमता आहे. नगर शहरात सर्वाधिक विद्यार्थ्यांसाठी जागा आहेत. दरम्यान, आर्थिक मागास प्रवर्गाचे 10 टक्के, मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षणाबाबत अद्यापही माध्यमिक शिक्षण विभागाला कोणीही सुचना नाही. त्यामुळे आरक्षणानुसार जागांची निश्चितचा घोळ होण्याची शक्यता आहे.
दहावीचा निकाल जाहिर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. त्यापूर्वीची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. जिल्ह्यात 375 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यात कला शाखेसाठी 366 वर्ग असून 31 हजार 160 विद्यार्थी क्षमता आहे. विज्ञान शाखेचे 416 वर्ग असून 35 हजार 720, वाणिज्य शाखेचे 117 वर्ग असून 10 हजार 800, तर संयुक्त शाखेचे 21 वर्ग असून त्यामध्ये 1 हजार 760 विद्यार्थी क्षमता आहे. एक तुकडीत 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. त्यात अनुदानितसाठी कला शाखेच्या 229 तुकट्या असून 20 हजार 200 विद्यार्थी क्षमता आहे. विज्ञान शाखेच्या 246 तुकट्या 22 हजार 120, वाणिज्य शाखेच्या 67 तुकट्या असून 6 हजार 800 विद्यार्थी क्षमता आहे. संयुक्तच्या 17 तुकट्यामध्ये 1 हजार 440 विद्यार्थी क्षमता आहे.
विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या 113 तुकट्या असून 9 हजार 40 विद्यार्थी क्षमता आहे. विज्ञान शाखेच्या 111 तुकट्यांमध्ये 8 हजार 880, वाणिज्य शाखेच्या 32 तुकट्यांमध्ये 2 हजार 560 तर संयुक्तच्या 4 तुकट्यांमध्ये 320 विद्यार्थी क्षमता आहे. स्वयंअर्थसहाय्यच्या महाविद्यालयात कला शाखेच्या 24 तुकट्या असून 1 हजार 920 विद्यार्थी क्षमता आहे. विज्ञान शाखेच्या 59 तुकट्यांमध्ये 4 हजार 720 तर वाणिज्य शाखेच्या 18 तुकट्यांमध्ये 1 हजार 440 विद्यार्थी क्षमता आहे. सध्या अकरावी प्रवेशासाठी पूर्वीचे आरक्षणानुसार नियोजन करण्यात येत आहे. आर्थिक मागस प्रवर्गाच्या 10 टक्के व मराठा आरक्षणाचे 16 टक्के आरक्षणाबाबत सुचना आलेल्या नाहीत. ऑनलाईन अकरावी प्रवेशासाठी आरक्षणाची सुचना देण्यात आल्या असतांना ऑफलाईन प्रवेशबाबत सुचना नसल्याने शिक्षण विभागाचा गोंधळ झाला आहे.