बंगळूर -इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवरून तापलेले राजकीय वातावरण तूर्त शमण्याची चिन्हे नाहीत. अशातच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी ईव्हीएमबाबत सर्वांत प्रथम भाजपकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्याकडे लक्ष वेधले आहे. भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल.नरसिंह राव यांनी दहा वर्षांपूर्वी ईव्हीएमवर आक्षेप घेणारे पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकासाठी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी प्रस्तावना लिहिली.
आता ईव्हीएमबाबतची भाजपची भूमिका बदलण्यामागचे कारण काय, असा सवाल सिद्धरामय्या यांनी ट्विटरवरून केला आहे. ईव्हीएमबाबत साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांची भाजपकडून खिल्ली उडवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, सिद्धरामय्या यांनी भाजपवर पलटवार केला आहे.