नवी दिल्ली – 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केल्यापासून भारतीय वायुदलाने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील सतर्कता वाढविली आहे. 4 राज्यांना पाकिस्तानची सीमा लागून असून तेथे वायुदलाची हवाई सुरक्षा यंत्रणा नेण्याची तयारी आहे. याकरता सुरक्षेच्या सर्व स्थितींचा विस्तृत अभ्यास करण्यात आला आहे.
पाककडून होणाऱ्य़ा कुठल्याही आगळिकीला चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक असल्याचे भारतीय सैन्याचे मानणे आहे. काही फायटिंग युनिट्स आणि एअर डिफेन्ससह डिफेन्स युनिटही सीमेनजीक तैनात करण्याचा विचार सुरू आहे. सीमेनजीक हे युनिट्स तैनात झाले तर शत्रूकडून होणाऱ्या कुठल्याही हल्ल्याला तोंड देता येणार असल्याचे सैन्याच्या वरिठ अधिकाऱ्य़ांनी म्हटले आहे. सैन्याची ही सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानचा प्रत्येक हवाई हल्ला हाणून पाडण्यास सक्षम आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाणार आहे. सैन्य आणि वायुदलाने तेथील
स्वतःच्या सज्जतेची सखोल समीक्षा पूर्ण केली आहे.
वायुदलाने सीमेवर आकाश हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आणि रशियाची कावाद्रत क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्याचा विचार चालविला आहे. याचबरोबर भारत आणि इस्रायलकडून संयुक्तपणे विकसित करण्यात आलेल्या एमआर-एसएएम सुरक्षा यंत्रणेच्या वापराबद्दलही विचार सुरू आहे. सरहद्दीपलीकडे हाते असलेल्या घडामोडीकडे बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीला तांड देण्याची तयारी करण्यात आली आहे.