मुंबई: राज्यात भीषण दुष्काळ आहे. पशुधन जगविण्यासाठी सरकारनं गांभिर्याने पावलं उचलणं आवश्यक आहे. पण आपल्या सरकारला अद्याप या प्रश्नाचं गांभिर्य समजलेलं दिसत नाही. अधिकाऱ्यांना केवळ खानापूर्ती करण्यासाठी चारा छावण्या उभारण्याचा देखावा केला जातोय का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातल्या दुष्काळावर उपाययोजना करुन जनतेला दिलासा देणे गरजेचे असताना, शासकीय पातळीवरील अनास्था खेदजनक आहे. मुख्यमंत्री केवळ राजकीय भाषणबाजीत व्यस्त आहेत. हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आज (दि. 16) दौंड तालुक्याती जिरेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, कुसेगाव, पडवी, खोर या जिरायती भागातील गावांना भेटी दिल्या. या जिरायती भागातील गावांतून ग्रामस्थांनी प्रामुख्याने चारा डेपो व पाण्याच्या टॅंकरची मागणी केली आहे. यावर्षी पाऊस झाला नसल्याने काही गावांतील ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे, तसेच काही गावांतील बंद पडलेला प्रादेशिक पाणी पुरवठा चालू करण्यात यावा आणि गावातील तलावात पाणी सोडण्यात यावे, तसेच जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी केल्या. दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून या गावांतील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.