खासगी बसेसमुळे रिक्षांच्या रांगा
पिंपरी – महामेट्रोचे काम सुरू असल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे आधीच अतिशय अरुंद झालेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी हा नित्याचाच विषय बनला आहे. या वाहतूक कोंडीत लांब पल्ल्याच्या खासगी बसेस मोठी भर घालत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या आणि वेग-वेगळ्या ठिकाणाहून येऊन मुंबईच्या दिशेला निघालेल्या खासगी बसेसना येथेच थांबा केला आहे. या बसमुळे रिक्षांची देखील येथे रांग लागते आणि वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र बनते.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात बेशिस्त खासगी वाहनांमुळे शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कासारवाडी येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी वाहनांच्या रांगामुळे महामार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. खासगी बसेसने येथे थांबा केला असल्याने येथे कायम प्रवासी उतरतात किंवा येथून प्रवास सुरु करतात. बस येण्याआधीच रिक्षाचालक आपल्या रिक्षा घेऊन येथे येऊन उभारतात. बसच्या पुढे लागणाऱ्या रिक्षांच्या रांगेमुळे कोंडीत भर पडते.
निगडी ते दापोडी पर्यंत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील स्थिती सारखी असून खासगी प्रवासी वाहतूक करणारे ट्रॅव्हल्स व इतर वाहने सर्रास कुठेही उभी केली जात आहेत. त्या बसमधून आलेल्या प्रवाशांना नेण्यासाठी रिक्षा भर रस्त्यात रांगा लावत आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. बेशिस्त वाहन चालवणे, चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणे किंवा वाहतूक नियम न पाळल्यामुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.