कामशेत – कामशेत येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उड्डाणपुलाचे कामास वारंवार मुदतवाढ देऊनही ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही. अपूर्ण कामामुळे घडणाऱ्या अपघाताच्या घटनेस ठेकेदारास जबाबदार धरून त्याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निर्माण कन्सट्रक्शनचे अरुण भैरू पाटील, चीप कॉर्डिनेटर प्रवीण तायडे व मुख्य प्रशासकीय अधिकारी चेतन महाडिक यांच्या विरोधात मंगळवारी (दि. 14) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामशेत येथील महामार्गावरील पवनानगर फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, हे काम महामार्गावर सुरू असल्याने महामार्ग सर्विस रस्त्यावरून वळविण्यात आलेला आहे, मात्र महामार्ग वळविल्याचे व महामार्गावर काम सुरू असल्याचे सूचना फलक व दिशादर्शक, रिफ्लेक्टर या प्रकारच्या कोणत्याही गोष्टींचा अवलंब न केल्याने महामार्गावर काम सुरू आहे किंवा महामार्ग बाजूने वळविण्यात आलेला आहे, याची वाहन चालकास कल्पना येत नसल्याने या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यात वाहने जाऊन वारंवार अपघात होत आहेत.
मंगळवारी (दि. 7) पहाटे मुंबईवरून पुण्याला दुचाकी घेऊन निघालेल्या विवेक विलास सुवारे (वय 25, रा. गोरेगाव, मुंबई) याचा मृत्यू झाला. कामशेत येथील महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी ठेकेदाराने घेतलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडून जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दुचाकी चालकाची कोणतीही चूक नसताना ठेकेदाराच्या बेजाबदार पणामुळे नाहक जीव गमवावा लागल्याने पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांमधून मागणी होत होती .
पोलीस नाईक वैभव सपकाळ यांनी या अपघातील तपास करताना या अपघातास ठेकेदार जबाबदार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघातावरून या पुलाचे काम करणाऱ्या निर्माण कन्सट्रक्शनचे अरुण भैरू पाटील, चीप कॉर्डिनेटर प्रवीण तायडे व मुख्य प्रशासकीय अधिकारी चेतन महाडिक यांच्या विरोधात मंगळवारी (दि. 14) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे तपास करीत आहेत.