-चिखलीचा बदलला चेहरामोहरा; विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे
-वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा हा ज्वलंत प्रश्न
पिंपरी – टाळगाव चिखली म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखली गावात पाणी, रस्ते, शाळा आदी प्रमुख सुविधा झाल्या आहेत. गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. विकास आराखड्यातील नियोजित रस्त्यांच्या विकासाला मात्र आता कुठे खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत कमी पडणारा पाणीपुरवठा हा ज्वलंत प्रश्न मात्र कायम आहे.
चिखली गावात जाधववाडी, कुदळवाडी, नेवाळे वस्ती, मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, ताम्हाणे वस्ती, सोनवणे वस्ती, शेलार वस्ती, बग वस्ती, चिखली गावठाण, पाटीलनगर आदी भागाचा समावेश होतो. चिखलीची लोकसंख्या सुमारे 40 हजारापर्यंत पोहचली आहे. चिखली-कुदळवाडी पट्ट्यात लघुउद्योग आणि भंगार मालाची गोदामे मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच गोदामांना लागणारी आग एक मोठी समस्या आहे.
देहू-आळंदी रस्ता विकसित झाला आहे. शाळेची नवीन इमारत बांधून तयार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे काम विरोधामुळे थंडावले आहे. विकास आराखड्यातील कामांसाठी सध्या नागरिकांना विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर), चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) आणि मोबदला रक्कम देऊन जागांचा ताबा घेतला जात आहे. परिसरात विकासकामांसाठी एकूण 84.17 हेक्टर इतक्या जागेत 84 आरक्षणे टाकली आहेत.
प्राथमिक शाळा, व्यापारी संकुल व मार्केट, वाहनतळ, कम्युनिटी सेंटर व ग्रंथालय, उद्यान, दवाखाना व प्रसुतिगृह, खेळाचे मैदान, बस टर्मिनस, माध्यमिक शाळा, रूग्णालय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे अशा विविध आरक्षणांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी 16.99 हेक्टर इतकेच क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आले आहे.
“समाविष्ट गावांचा विकास आराखडा 2008 मध्ये मंजूर झाला. त्यानंतर गावांतील रस्त्यांची डागडुजी व अन्य कामे करण्यात दहा वर्ष गेली. चिखलीमध्ये सध्या टीडीआर, एफएसआय आणि मोबदला रक्कम देऊन विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी आवश्यक जागांचा ताबा नागरिकांकडून मिळत आहे. त्यामुळे संबंधित रस्ते व आरक्षणांचा विकास करण्यास मुहूर्त सापडला आहे.
– राहुल जाधव, महापौर
काय हव्यात सुविधा
-पाटीलनगर भागातील अंजनीगाथा, धर्मराजनगर येथील लोकांसाठी बसची सोय
-वाढती लोकसंख्या लक्षात घेता रूग्णालय उभारणे गरजेचे
-विकास आराखड्यातील प्रमुख रस्त्यांचा व विकासकामांच्या आरक्षणांचा विकास
“देहू-आळंदी रस्ता सोडला तर अन्य विकास आराखड्यातील रस्ते झालेले नाही. उद्यान, खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आदी जुजबी सुविधा आहेत. त्यामध्ये वाढ व्हायला हवी. वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. विकासकामांसाठी टाकलेली आरक्षणे विकसित व्हायला हवी.
– सुनील लोखंडे, माजी नगरसेवक
रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी
चिखली गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कुदळवाडी भागात स्थिती गंभीर आहे. या पट्ट्यातील अंतर्गत रस्ते खडकाळ आहेत. आकुर्डी ते चिखली, सोनवणे वस्ती ते ज्योतीबानगर, शेलारवस्ती ते जाधववाडी (मोशी) आणि पाटीलनगर हायस्कुल ते देहू-आळंदी (रुंदीकरण) या रस्त्यांची सुधारणा होणे आवश्यक आहे. चिखली गावातील मुख्य चौकात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी हा बीआरटीएस रस्ता जिथे जोडला जातो, त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे.