काय होणार फायदा
-हमीभावानुसार सबसिडी मिळण्यास मदत शेतकरीनिहाय पीकांच्या नोंदी घेतल्या तर निश्चित पीक लक्षात येईल.
-नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळणार
पुणे – सातबारा उताऱ्यावर आता शेतकरीनिहाय (खातेदार) पिकांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले आहे, याची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच हमीभावाने पीकांची खरेदी झाल्यास सबसिडी मिळण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागात गावपातळीवर जमिनीचे महसुली लेखे ठेवण्यासाठी विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना हा नंबर सात हा अधिकार अभिलेख विषयक असून गाव नमुना बारा पिकांची नोंदवही ठेवण्यासंदर्भात आहे. गाव नमुना नंबर 12 मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावयाच्या असतात.
सध्यस्थितीत एका सर्व्हे नंबर अथवा गट नंबरवर एकत्रित पिकांची नोंदी घेतल्या जातात. एका सर्व्हे नंबर किंवा गट नंबरमध्ये कोणती पिके घेतली आहेत. याची नोंद एकत्र घेतली जाते. त्यामुळे सातबारा उताऱ्यामधील कोणत्या शेतकऱ्यांनी कोणते पीक लावले आहे. याची नोंद सातबारा उताऱ्यावर नसते. त्यामुळे शेतकरीनिहाय पिकांची यादी शासनदरबारी उपलब्ध होत नाही. भूमि अभिलेख विभागाने सातबारा उताऱ्यावर शेतकरीनिहाय पिकांची नोंद घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर ई फेरफार प्रणालीमध्ये यासाठी आवश्यक ते बदल करून शेतकरीनिहाय पिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत.