सुनील राऊत
शहरात अवघ्या 2 हजार सायकल
चारमधील तिसऱ्या कंपनीचीही माघार
कंपन्यांचे होतेय आर्थिक नुकसान
पुणे – मोठा गाजावाजा करत महापालिकेने मागील वर्षी सुरू केलेली पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. ही योजना सुरू करताना, चार कंपन्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख सायकल उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. मात्र, यातील तिसऱ्या कंपनीनेही संचलन बंद करण्याची घोषणा केल्याने शहरात आता केवळ एकच सायकल कंपनी शिल्लक आहे. या कंपनीच्याही केवळ दोन ते तीन हजार सायकलच नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
शहरात एकात्मिक सायकल आराखडा योजनेनुसार एकूण 824 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक प्रस्तावित आहेत. त्यापैकी पथ विभागाने सुमारे 26 किलोमीटरचे ट्रॅक तयार केले आहेत. 28 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक प्रगतीपथावर आहेत. पब्लिक बायसिकल शेअरिंग योजनेसाठी पालिकेने कोणताही खर्च केलेला नाही. साकल्सचा वापर, नागरिकांची मागणी यानुसार फर्गसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, एमआयटी, शिवाजीनगर, कोथरुड, लॉ कॉलेज रस्ता, सिंहगड रस्ता, नांदेड सिटी, कर्वेनगर, बी.टी.कवडे रस्ता, ऍमनोरा-हडपसर, औंध, पुणे विद्यापीठ या भागांत सुमारे 526 सायकल स्टेशन्सची आखणी पूर्ण करण्यात आली.
त्या अंतर्गत ओफो, पेडल, मोबाइक आणि युलु या कंपन्यांनी शहरात सायकली उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यातील ओफो कंपनीच्या सायकली शहरात अनेक ठिकाणी मोफत होत्या, तर इतर तीन कंपन्यांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येत आहे.मात्र, ज्या कंपनीने सायकली मोफत दिल्या त्यांच्या सायकलींची मोठ्या प्रमाणात मोडतोड तसेच चोऱ्या झाल्याने होणारे नुकसान लक्षात घेऊन कंपनीने सर्वांत आधी काढता पाय घेतला. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये पेडल या कंपनीने सायकलच्या निर्मित्तीत काही तांत्रिक चुका असल्याने सर्व सायकल बदलून देण्याचे कारण देत आपले संचलन बंद केले होते.
त्यानंतर आता उर्वरीत दोन कंपन्यांमधील मोबाइक या कंपनीनेही महापालिकेस पत्र देऊन संचलन बंद करण्याबाबत कळविले आहे. मोबाइकने चीन वगळतात इतर काही प्रमुख देशातील संचलन बंद करण्याची घोषणा केली असून त्यात भारताचाही समावेश आहे. त्यामुळे या कंपनीकडूनही लवकरच सायकल काढून घेण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
सायकल पार्टस चोरी आणि मोडतोडीचाही फटका
या चारही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सायकल पुरविल्याने डिसेंबर 2018 मध्ये शहरात सुमारे 8 ते 10 हजार सायकल होत्या. मात्र, आता तीन कंपन्यांनी माघार घेतल्याने शहरात या योजनेसाठी केवळ दोन ते तीन हजार सायकलच उपलब्ध आहेत. त्यामुळे या योजनेसाठी शहरात सध्या केवळ एकच कंपनी संचलनात असल्याचे चित्र आहे. त्यातच, या सायकलींची मोडतोड आणि चोरीचे प्रमाण जास्त असल्याने पालिकेने 15 ते 20 ठिकाणचे सायकल संचलन बंद केले आहे. त्यामुळे तीन कंपन्यांनी माघार घेतल्याने पालिकेची ही योजना चांगलीच अडचणीत सापडली असतानाच या एकमेव तग धरून असलेल्या कंपनीनेही संचलन बंद केल्यास ही योजना पालिकेस गुंडाळावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात
या योजनेसाठी नवीन सायकल ट्रॅक, अस्तित्वातील ट्रॅकची दुरूस्ती, सायकल पार्किंगचे फलक तसेच मार्किंग करणे, जनजागृतीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च पालिकेने केला आहे. असे असतानाच, सायकल पुरविणाऱ्या कंपन्या माघार घेत असल्याने हा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली असून पालिकेकडून या योजनेसाठी कंपन्यांचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे.