हिमांशू
गाढवांची संख्या कमी होत चाललीय, असं कुणी म्हटलं तर लोक संबंधितालाच “गाढव’ म्हणतील. “मालक’ जे काही पाठीवर लादतील, ते काय आहे याचा विचार न करता त्याची वाहतूक करणाऱ्या, सहसा “बिनडोक’ म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या आणि बेंबीच्या देठापासून अत्यंत बेसूर ओरडणाऱ्या गाढवांची आपल्याकडे कमतरता आहे, हे कुणाला सांगून पटेल का? तेसुद्धा निवडणुकांचा सीझन सुरू असताना? परंतु हल्ल् निवडणुकांचा सीझनसुद्धा आयपीएलच्या सीझनइतका मोठा झालाय आणि या काळातसुद्धा इतर काही महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात; महत्त्वाची माहिती मिळत असते. गाढवपणा करणाऱ्या माणसांना तोटा नसला, तरी खऱ्याखुऱ्या गाढवांची संख्या कमी होत चाललीय, ही अशीच एक माहिती. गाढवाला पाणी पाजणाऱ्या नाथांची परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात या प्राण्याची संख्या खरोखर कमी होत चाललीय आणि खुद्द पशुसंवर्धन खात्यानंच ही माहिती दिलीय.
आपल्याकडे मढी, जेजुरी अशा ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. स्थानिक आणि काठेवाडी गाढवं विक्रीसाठी आणली जातात. दात मोजून गाढवांच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधला जातो आणि मग त्यांच्या किमती ठरतात. गाढवांकडून करून घेतल्या जाणाऱ्या कामांशी ज्यांचा दुरान्वये संबंध येत नाही, अशा शहरी माणसाला गाढव हा केवळ “उच्छाद’ म्हणूनच ठाऊक असतो. भररस्त्यात वेडीवाकडी धावणारी गाढवं काळजाचा थरकाप उडवतात, तर कधी रात्री-बेरात्री ओरडून झोपमोड करतात.
खरं तर नदीपात्रातली माती पाठीवरून वीटभट्टीपर्यंत वाहणारा हा गुणी प्राणी. ज्याच्या कष्टाकडे कायम डोळेझाक करण्यात आली, असा हा जीव. बैलाचे श्रम शहरात बसून शेतीमालाचा “भाव’ करणाऱ्याला कळले नाहीत, तरी शेतीमाल पिकवणाऱ्या बळीराजाला त्याची जाणीव असते. सध्या जिथं माणसाच्याही श्रमांना किंमत उरलेली नाही, तिथं या मुक्या जिवांच्या कष्टाचं मोल कुणाला असणार? आपल्या अनेक पिढ्या जगवणारे हे प्राणी यांत्रिकीकरणानंतर माणसानं खड्यासारखे बाजूला केले. आज जेसीबी, पोकलॅन आणि डंपरच्या जमान्यात गाढवांचं तेच झालंय. जंगली प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात असल्याची जाणीव तरी वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला होत असते; पण शहरात राहून मेहनतीची कामं करणारी गाढवं आपल्या खिजगणतीतही नसतात.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2007 मध्ये राज्यात 32 हजार 70 गाढवं होती. पाचच वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये 29 हजार 135 गाढवं शिल्लक राहिली. त्यामुळं या विभागानं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून गाढवांचं संवर्धन करण्याचे निर्देश दिलेत. पाणी पाजणं सोडा; पण किमान मूर्ख किंवा सांगकाम्या लोकांना उपमा देण्यासाठी तरी गाढवं शिल्लक राहायला हवीत ना? अर्थात, जिथं 80 टक्के पिकांचं फलन करणाऱ्या मधमाश्यांच्या अस्तित्वाची चिंता आपण सोडली, तिथं गाढवांची काय कथा! तसं पाहायला गेलं, तर जगात एकही जीव “फालतू’ नाही; परंतु “पालतू’ प्राणी वगळता इतर जिवांना “फालतू’ समजणाऱ्या आणि आपल्या अस्तित्वासाठी प्रसंगी “पालतू’ बनणाऱ्या माणसाला सात पिढ्यांसाठी भरपूर कमाई करून ठेवायचीय. सातवी पिढी जगणार कशी, याची चिंता त्याला बिलकूल नाही. आपल्या प्रजातीला जणू अमरपट्टाच मिळालाय, असं समजून इतर सर्व प्राणिमात्र “झाले तर होऊदे नामशेष’ असं म्हणणाऱ्या माणसाला “गाढव’ कोण हे काळच सांगेल!