भीषण टंचाईग्रस्त गावाला एक किमी अंतरावरून पाईपलाईनद्वारे पाणी
जामखेड: लहानाचे मोठे ज्या गावात झालो, जेथे सुखाचे क्षण अनुभवले, तोच गाव आता दुष्काळात पाण्यासाठी होरपळताना दिसत आहे. दुष्काळाच्या दहाकतेवर मात करण्यासाठी कुसडगावतील “त्या’ चार तरुणांनी पुढाकार घेऊन गावासाठी काही तरी केले पाहिजे, या हेतूने गावासाठी एक किमी अंतरावरून एका विहिरीतून 40 पाईपलाईनव्दारे पाणी आले. गावाच्या मध्यभागी 2 हजार लिटरच्या टाकीमध्ये हे पाणी टाकून गावाचा पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. या पाण्यामुळे वणवण फिरणाऱ्या महिलांची हेडसाळ या तरुणांनी थांबवली. या आशादायी उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
जामखेडपासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेले कुसडगावाची दोन हजार पाचशे लोकसंख्या आहे. या गावाला काझेवाडी तलावाजवळील ग्रामपंचायतीच्या विहिरींमधून पाणीपुरवठा होत होता, मात्र दुष्काळामुळे पाणीपातळी खालावल्याने गावाला पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यातही गावाला एका शासकीय टॅंकरव्दारे गावातील विहिरीमध्ये पाणी सोडले जाते. तरीच परिस्थिती बिकटच होती. गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातील उद्योगपती संजय कार्ले, राजुभाऊ देशपांडे, माजी सरपंच हवा सरनोबत, गावचे पोलिस पाटील निलेश वाघ यांनी पुढाकार घेऊन गावातील नागरिकांची विशेषतः महिलांची पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या राजुभाऊ देशपांडे यांच्या विहिरीमधून गावात पाणी आणण्यासाठी उद्योगपती संजय कार्ले, राजुभाऊ देशपांडे यांनी गावासाठी जैन कंपनीचे 40 पाईप व पाईपलाईन खोदण्यासाठी जेसीबी मशीन दिले, गावाचे आदर्श माजी सरपंच हवा सरनोबत यांनी गावात मध्यभागी 2 हजार लिटरची पाण्याची टाकी, पाण्याची टाकी ठेवण्यासाठी कठडा बांधकामाचे सर्व साहित्य गावाचे पोलीस पाटील निलेश वाघ यांनी दिले असे या चार जणांनी एकत्र येऊन 40 हजाराचा आसपास खर्च करून आपल्या गावातील पाणीप्रश्न मिटविण्यासाठी पुढाकार घेतला.
त्यांना या कामासाठी गावातील पै बापुसाहेब कार्ले, अमोल कार्ले, आप्पासाहेब कार्ले, गणेश कार्ले, वैभव कार्ले, दत्ता सरनोबत, आशिष कार्ले, सुनिल कार्ले, मुकुंद भोगल, अशोक कार्ले, महादेव भोगल, शैलेश कुलकर्णी, भरत भोगल, अमोल भोगल, श्रीनिवास भोगल, संभाजी वटाणे(महाराज), नाना कार्ले, बंडू कार्ले, अविनाश भोगल, अशोक भोगल, पोपट कार्ले, कैलास पवार, विकास कार्ले, लखन काकडे, हनु टिळेकर, रामभाऊ टिळेकर, अंगद टिळेकर, शिवाजी काकडे, लिंबाजी कार्ले, सिद्धेश्वर कार्ले, विलास कात्रजकर, भरत पाठक, बिभिषन जमदाडे, परसराम काकडे, सागर काकडे हे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी देवून गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्वांमुळे गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली असून गावाला मुबलक पाणी पुरवठा होत आहे. पुढील वीस वर्षाचे नियोजन करुन गावामध्ये चांगली पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे. मात्र तोपर्यंत तरी चार जण गावची तहान भागविणार आहेत.