10 मेपर्यंत प्रवेश घेता येणार
पुणे – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांसाठीच्या पहिल्या सोडतीत जाहीर झालेल्या प्रवेशांसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. आता दि. 10 मेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेता येणार आहे. आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत दि. 8 एप्रिल रोजी जाहीर झाली. त्यात राज्यभरातील 67 हजार 706 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.
या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधी दि. 26 एप्रिलची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून दि. 4 मेपर्यंत करण्यात आली. मात्र, कागदपत्र पडताळणीची संथगती आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी आल्या. तसेच विविध संघटनांनी प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. आरटीई अंतर्गत आतापर्यंत सुमारे 43 हजारांच्या आसपास प्रवेश झाले आहेत. अद्यापही मुदतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आले नाही. प्राथमिक शिक्षण विभागाने शनिवारी दि. 10 मे पर्यंत मुदतवाढ दिल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावी लागली, असे आप पालक युनियनसह अन्य संघटनांचे म्हणणे आहे.