नवी दिल्ली – आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असलेले माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज विधान केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विश्वास दाखवताना “जर ते अमेठीतून हरले तर मी राजकारण सोडेन’ असे त्यांनी म्हटले आहे. रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवाद शिकायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी सिद्धू यांनी भाजपाकडून कॉंग्रेसवर वारंवार होत असलेले आरोपही खोडून काढले आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकाळात 70 वर्षात कोणताही आर्थिक विकास झाला नाही या भाजपाच्या आरोपावर सिद्धू म्हणाले, या काळात सुईपासून विमानांपर्यंत ज्या काही वस्तू बनवण्यात आल्या त्या या देशातच बनवल्या गेल्या होत्या.
त्याचबरोबर सोनिया गांधी यांनी पार पाडलेल्या कॉंग्रेस नेतृत्वाचेही त्यांनी कौतुक केले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया यांनी कॉंग्रेसचे सक्षमपणे नेतृत्व केले. त्यामुळेच केंद्रात 10 वर्षे (2004 ते 2014) कॉंग्रेसची सत्ता कायम राहिली, असे सिद्धू म्हणाले.
जो कोणी भाजपाशी प्रामाणिक राहिल त्यालाच केवळ राष्ट्रवादी मानले गेले. मात्र, ज्यांनी त्यांचा पक्ष सोडला ते त्यांच्यासाठी देशद्रोही ठरले, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला. राफेल डीलचा मुद्दा मोदींचा पराभूत करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.