नवी दिल्ली- सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप हे मोठ्या कारस्थानाचा भाग आहेत. या आरोपांची पाळेमुळे खणून काढली जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. अशाप्रकारे कारस्थानाद्वारे न्यायपालिकेला बदनाम करणे सुरूच राहिले तर न्यायपालिकाही अस्तित्वात राहणार नाही आणि न्यायाधीशही टिकून राहणार नाहीत, असे न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पिठाने स्पष्ट केले. या पिठामध्ये न्या. आर.एफ.नरिमन आणि न्या. दीपक गुप्ता यांचाही समावेश आहे.
सरन्यायाधीशांवरील आरोप हा एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे, असा दावा ऍड उत्सव सिंह बायन्स यांनी न्यायालयासमोर एका अन्य प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. या कारस्थानाशी संबंधित काही महत्वाचे पुरावे आणि धागेदोरे आपल्याजवळ असल्याचा दावाही बायन्स यांनी केला आहे. या प्रतिज्ञापत्राची दखल घेऊन या प्रकरणी गुरुवारी सुनावणी केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
बायन्स यांच्या दाव्यावरील सुनावणी आणि सरन्यायाधीशांवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या अंतर्गत चौकशीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बुधवारी न्यायालयाने सीबीआय, गुप्तचर विभाग आणि दिल्ली पोलिसांच्या प्रमुखांना समक्ष येऊन भेटण्यची सूचना केली.
“मोठे कारस्थान’ हा विषयच खूप व्यथित करणारा आहे. त्यामुळे या कारस्थानाच्या दाव्यच्या मूळापर्यंत गेले पहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान ऍटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली “एसआयटी’ नेमण्याची मागणी केली होती. मात्र अशी कोणतीही चौकशी न्यायालयकडून केले जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांना गोपनीय कारणासठी भेटणर आहोत. कोणताही पुरावा उघड केला जाणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले.