नवी दिल्ली – युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, अनुभवी अंबाती रायुडू व युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांची बीसीसीआयने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. मुख्य संघातील कुणी खेळाडू जखमी किंवा अन्य कारणांमुळे खेळू न शकल्यास या तिघांपैकी एकाची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
खलील अहमद, दीपक चहर आणि आवेश खान हे संघासमवेत नेट गोलंदाज असतील. आयपीएलचा समारोप 12 मे रोजी होईल. त्यानंतर विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची यो-यो चाचणी होण्याची शक्यता आहे. पंत व रायुडूची मुख्य संघात निवड होऊ न शकल्याने तिखट प्रतिक्रिया आल्या होत्या. सुनील गावसकर यांनी पंतला वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.