इस्लामाबाद – भारतीय राज्य घटनेत काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम टाकण्यात आले आहे पण हे कलम रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असून भारताने तशी कृती केली तर ती संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांच्या विरोधातील कृती ठरेल त्यामुळे भारताने अशी कृती करणे आम्ही मान्य करणार नाही असे फुत्कार पाकिस्तानने काढले आहेत.
पाकिस्तानचे विदेश मंत्रालय प्रवक्ते मोहंमद फैजल यांनी शुक्रवारी पत्रकारांना संबोधीत करताना सांगितले की भारताने घटनेतील 370 कलामाच्या विरोधात कोणतीही कृती करणे हे संयुक्तराष्ट्रांच्या ठरावाच्या विरोधातील कृती ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाने घटनेतील कलम 370 रद्द करणे हा पुन्हा निवडणूक मुद्दा केला आहे.
आम्ही हे कलम रद्द करण्यास वचनबद्ध आहोत. पण राज्यसभेत आम्हाला बहुमत नसल्याने आम्हाला तेथे ही कृती करता आली नाही असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अलिकडेच केले होते. त्यावर पाकिस्तानने ही शेरेबाजी केली आहे. शहा यांच्या विधानावर जम्मू काश्मीरातील नेत्यांनीही आक्षेपार्ह विधाने केली आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की घटनेतील कलम 370 आणि 35 ए ही कलमे रद्द केली तर जम्मू काश्मीरचा भारताशी असलेला संबंध संपुष्ठात येईल असा इशारा आपले वडिल शेख अब्दुल्ला यांनी दिला होता.