सोलापूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज भाजप वर हिंदू दहशतवाद या मुद्दयावर पलटवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोजगार, विकास आणि शेतकऱ्यांच्या विषयावर काहीही बोलत नाहीत. तसेच हिंदू दहशतवादाचा मुद्दा हा आम्ही कधीही उंचावून धरला नाही, तर गुप्तचर विभागाकडूनच मिळालेल्या माहितीच्या आधारेच कारवाई केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसच्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनीही प्रचार सुरु केल्यापासून भारतीय जनता पक्ष हा घाबरला असल्यानेच त्यांनी हिंदू दहशतवाद हा ९ वर्षांपूर्वीचा मुद्दा उकरून काढल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यातील सभेत हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर निशाणा साधला होता. देशातील हिंदूंना ‘हिंदू दहशतवादी’ संबोधण्याचं पाप काँग्रेसने केले असून त्यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही. जनता त्यांना निश्चितच शिक्षा देईल, अशी घणाघाती टीका मोदींनी केली होती. त्यावर उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही कधीही हिंदू दहशतवादाचा मुद्दा उंचावून धरला नाही, तर गुप्तचर विभागाकडून जी माहिती देण्यात आली त्यावरच पुढील कारवाई केल्याचे सांगितले. मोदींकडे बोलण्यासाठी रोजगार, विकास आणि शेतकऱ्यांच्या विषयावर काही राहिले नसल्यानेच आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी प्रचार सुरु केल्यामुळे ते घाबरले आहेत. आणि म्हणूनच त्यांनी हिंदू दहशतवाद हा जुना मुद्दा उपस्थित केला असल्याची टीका शिंदेनी यावेळी केली.