Prakash Ambedkar-Manoj Jarange। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ट्विस्ट निर्माण झाला असल्याचे दिसत आहे. कारण महाविकास आघाडी-वंचित बहुजन आघाडीत युती होणार कि नाही हा प्रश्न अजून सुटला नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी रात्री अचानक आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीची साथ सोडणार असल्याच्या बातम्या येत असतानाच, त्यांनी थेट मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर हे आपली भूमिका आज स्पष्ट करणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर थेट आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तासभर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वेळ आल्यावर नक्की सांगणार असे म्हटले.
राजकारणात मला हलक्यात घेऊ नयेत Prakash Ambedkar-Manoj Jarange।
या भेटीवर मनोज जरांगे यांनी, ‘माझा राजकारणावर विश्वास नाही. समाजाने नाही म्हटले तर नाही. पण समाज हो म्हटला तर इतक्या ताकदीने उतरणार की, त्यांनी मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते तसे राजकारणात घेऊ नयेत असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच, वंचितकडून प्रस्ताव आला असला तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार समाजाच्या हाती दिले आहेत. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. त्यामुळे समाजाच्या म्हणण्यानुसार 30 तारखेला चित्रच स्पष्ट करू. गावा-गावातून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेवू, माझा जन चळवळीवर विश्वास आहे,” असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडीची घोषणा करणार?Prakash Ambedkar-Manoj Jarange।
महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या जागावाटपाच्या बाबतीत अनेक बैठका झाल्या. मात्र, वंचितला चार जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. पण, मविआचा हा प्रस्ताव आंबेडकर यांना मान्य नाही. त्यामुळे मविआसोबत काडीमोड करून प्रकाश आंबेडकर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.