– हेमंत देसाई
भारतीय निवडणुकांमध्येही एआयचा वापर होऊ लागला आहे. परंतु प्रत्येक क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर असून, म्हणूनच भारतासाठी या क्षेत्रात बर्याच संधी निर्माण होणार आहेत.
केंद्र सरकारने कॉम्प्युटर म्हणजे संगणकीय पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 10 हजार 372 कोटी रुपयांचा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कार्यक्रम लॉन्च केला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्योग व्यावसायिकांना त्यांच्या डेटा सेंटरचे रूपांतर कॉम्प्युटर युनिट्समध्ये करण्यासाठी वेगवेगळी प्रोत्साहने दिली जाणार आहेत. अर्थात, यामुळे जगाचे कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र किंवा फॅक्टरी होण्याचे लक्ष्य गाठता येईल, असे मत ‘नविदिया’चे दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल धुपार यांनी व्यक्त केले आहे. कॉम्प्युटर युनिट्समुळे बुद्धिमत्तेची निर्मिती होते. पूर्वीच्या काळात एका बाजूला पाणी असे आणि दुसर्या बाजूला वीज निर्माण केली जात असे. कारखाने उभारले जात असत. आता एकीकडे माहिती किंवा डेटा असेल आणि दुसर्या बाजूला त्यामधून बुद्धिमत्तेची निर्मिती होईल. शिवाय भारतात मुळातच बुद्धिमानांची संख्या मोठी आहे. देशात या क्षेत्रात सार्वजनिक आणि खासगी कंपनीची भागीदारी केली जात आहे.
आता मोठ्या प्रमाणात माहितीचे संकलन करणे, आकडेवारीचे गणन-विश्लेषण करणे, तिचा अन्वयार्थ लावणे याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शेकडो सेंटर प्रोसेसिंग युनिट्सवर (सीपीयू) जगावर अधिराज्य गाजवू शकतात. इमेज आणि व्हिडिओ प्रोसेसिंगसाठी जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्म्सना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. आज जगभरात संशोधनात भारताचा वाटा दोन टक्केदेखील नाही. उलट चीन आणि अमेरिकेचा तो अनुक्रमे 58 टक्के व 59 टक्के इतका आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत संशोधनावरील आपला खर्च एक टक्कादेखील नाही. तर अमेरिका, चीनचा तो साडेचार टक्के इतका आहे. हा खर्च हे देश मुख्यतः संशोधनविषयक पायाभूत सुविधांवर करतात. म्हणून भारताने या देशांपासून शिकण्यासारखे आहे.
गेल्या वर्षी एआयच्या जागतिक भागीदारी संघटनेचा भारत हा अध्यक्ष होता. एआयच्या तंत्रज्ञानात जो श्रेष्ठ असेल, तो जगावर राज्य करील, असे काही वर्षांपूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतीन म्हणाले होते. भारताने सार्वजनिक सेवा, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, वित्त अशा अनेक क्षेत्रांत एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. एआयचा वापर आणि त्या क्षेत्रात काम करणारे कुशल कर्मचारी या बाबतीत भारताने बरीच प्रगती केली आहे. पुढील वर्षापर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये एआयच्या माध्यमातून 500 अब्ज डॉलरची भर टाकली जाईल, असा अंदाज आहे; परंतु या नव्या प्रवाहात भारताच्या आयटी क्षेत्रातील नोकर्या कमी होतील का, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी ‘ओपन एआय’ या कंपनीने ‘चॅट जीपीटी’ या लोकप्रिय संवादप्रणालीला बाजारात आणले. भविष्यात नवनवे तंत्रज्ञान विकसित होऊन ते बाजारात येणारच आहे. त्यामुळे त्याबाबत मागे राहून चालणार नाही. नीती आयोगाने 2018 मध्ये भारताचे कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधीचे राष्ट्रीय धोरण जाहीर केले. परंतु आता या क्षेत्रात झालेली प्रगती पाहता, ते धोरण मागे पडले असून, नवे धोरण ठरवणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी देशपातळीवरील एक शिखर संस्था स्थापन करण्याची गरज आहे.
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, यावेळी लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एआयचा उपयोग केला जात आहे. एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या गोष्टी मतदारांच्या छोट्या छोट्या गटांना त्यांच्या प्रोफाइलनुसार पाठवल्या जातील. हे व्हिडिओ तयार करणारे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी आज सर्वज्ञात आहे. इंटरनेटवरून सर्व माहिती शोधून, त्यावर ब्लॉग लिहिणे, गाणी व कविता रचणे हे सर्व त्यामुळे शक्य होते. हायर ग्राउंड्स लॅबसारख्या जागतिक कंपन्या निवडणूक प्रचारात वापरण्यात येणार्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहेत. या लॅबच्या सहसंस्थापक बेटसी हूवर यांनी 2007 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निवडणूक प्रचार आयोजक म्हणून काम केले होते. ओबामांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला होता. यापूर्वी निवडणुकीचे मेसेज ईमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून पाठवले जात होते.
परंतु आता एआयचा वापर करून मतदारांचे प्रोफाइल आणि प्राधान्य शोधता येते. त्यानुसार उमेदवार आपल्या प्रचारतंत्रात बदल करू शकतो. हे तंत्रज्ञान मतदारांच्या प्रोफाइल आणि विचारांवर आधारित निवडणूक प्रचार साहित्याची निर्मिती करू शकते. उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर कंटेंट रायटर व रणनीतिकारांची नियुक्ती केली जाते. हे लोक प्रत्येक पोस्टमध्ये वेगळेपण तयार करून, अलग अलग मतदारांपर्यंत संदेश पोहोचवतात. यामुळे हे काम अधिक नेमके जलद व स्वस्तात होते. एआय तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की, आता कोणाच्याही आवाजाची हुबेहूब नक्कल करता येते. मात्र, याचा गैरवापरही होऊ शकतो. मागच्या दोन दशकांत कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर बनवण्याची आपली क्षमता वेगाने वाढली आहे. तसेच सामान्य माणूस फोटो, व्हिडिओ, आवाज या स्वरूपातील बरीचशी माहिती समाजमाध्यमात टाकत असतो. आता मशीन तुमचा आवाज, चेहरा ओळखते आणि तुमच्या कुटुंबीयांची माहितीही त्यांच्याकडे असते. जनरेटिव्ह एआयच्या मदतीने एखाद्याचे टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ वापरून बनावट कंटेंट बनवणे देखील सोपे झाले आहे. आता व्हॉइस क्लोनिंगदेखील होऊ लागले आहे. ‘चॅट जीपीटी’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे एक सॉफ्टवेअर आहे.