– सरोजिनी घोष
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष खेचून घेणारे राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. कारण, भाजपाला हा गड अद्याप सर करता आलेला नाही. तर भाजपाला कोसोदूर ठेवण्यासाठी ममतादीदी कोणती खेळी खेळणार?
लोकसभा निवडणुकांसाठी आता उणेपुरे दोन महिने बाकी राहिलेले असताना राजकीय समीकरणांना अंतिम रूप देण्यामध्ये देशातील सत्ताधारी आणि विरोधक जोरदारपणे कामाला लागले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील ‘एकला चलो रे’ चा नारा देत या राज्यातील 42 लोकसभा जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. ममतांच्या या निर्णयामुळे ‘इंडिया’ आघाडीत खळबळ उडणे स्वाभाविक होते. कारण एक काळ असा होता जेव्हा 26 पक्षांनी मिळून ही आघाडी स्थापन केली तेव्हा ममता दीदींना या आघाडीच्या नेत्या म्हणून प्रोजेक्ट केले जात होते.
पण त्याला नकार देत याच ममतादीदींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विरोधकांचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव देऊन नितीशकुमारांना नाराज केले होते. पुढे जेव्हा नितीश यांना महाआघाडीचे समन्वयक बनवण्याचा प्रस्ताव आणला गेला तेव्हा ममता बॅनर्जींच्या अनुपस्थितीचा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी त्याची घोषणा थांबवली. यानंतर आधी नितीश एनडीएमध्ये सामील झाले आणि आता ममतांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा करण्यासाठी कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सार्वजनिक मेळावा बोलावला होता. त्यांच्या या निर्णयानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्षाची पुढील रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही अभ्यासकांच्या मते, उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर बराच काळ चर्चा सुरू होती आणि शेवटी काँग्रेसला 17 जागा मिळाल्या, त्याच धर्तीवर पश्चिम बंगालमध्येही काँग्रेस ममतांसोबत चर्चा करू शकते. तसे झाल्यास ममता काही जागांवरून उमेदवार मागे घेऊन त्या काँग्रेसला देऊ शकतात. काँग्रेसला यासाठी थोडेसे बॅकङ्गूटवर जाऊन सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल; पण या नमत्या धोरणामुळे ममतादीदी ‘इंडिया’ आघाडीत राहण्याच्या शक्यता बळावतील. असा समझोता झाल्यास पश्चिम बंगालमधील सुरक्षित मतदार संघांमध्ये काँग्रेसला उमेदवार उभे करता येतील. जेणेकरून इंडिया आघाडीची प्रतिष्ठा राखली जाईल. अर्थात, यासाठी काँग्रेसला डाव्यांसोबत समन्वय साधावा लागेल आणि काँग्रेस ज्या जागांवर निवडणूक लढवते त्या जागांवर किमान डाव्यांनी आपले उमेदवार उभे करू नयेत, अशी विनंती करावी लागेल.
पण प्रश्न आहे तो ममतादीदी यास तयार होतील का? पश्चिम बंगालमधील प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी मागील काळात ममतादीदींना बराच विरोध केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेससोबतच्या समन्वयामुळे आपले नुकसान होऊ शकते आणि मतदार भाजपला मत देऊ शकतात, अशी ममतांची धारणा आहे. ममता यांना अल्पसंख्याक मतदारांचीही चिंता आहे. काँग्रेसकडे तगडे उमेदवार असलेल्या एक-दोन जागा सोडल्या तर भाजपच्या विरोधात अल्पसंख्याक मतदार त्यांच्या उमेदवारावर विश्वास ठेवतील, असे ममतांना वाटते. आघाडीतील तृणमूल काँग्रेस व्यतिरिक्त, इतर घटक पक्षांची राज्यात ताकद नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी 22 जागा तृणमूलने जिंकल्या होत्या; तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता. भारतीय जनता पक्षाने या राज्यात पहिल्यांदाच 18 जागांवर विजय मिळविला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलला मिळालेली मतांची टक्केवारी 43.69 होती; तर भाजपाने 40.64 टक्के मते मिळवली होती.
काँग्रेसला मिळालेली मतांची टक्केवारी 5.67 आणि माकपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 6.34 अशी होती. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपची मतांची टक्केवारी 22.25 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले होते. एकेकाळी राज्यात सर्वात बलाढ्य समजला जाणारा मार्क्सवादी पक्ष भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील लढतीमुळे संपुष्टात आला होता. पण राज्यात अजूनही डाव्यांची ताकद आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्या 2 वरून 77 वर पोहोचली. राजकारणात अनेकदा सत्य हे पृष्ठभागावर दिसत नाही. इंडिया अलायन्सच्या सदस्य असूनही ममतादीदी पहिल्यापासून सांगत आल्या आहेत की पश्चिम बंगालमध्ये त्या एकट्याच भाजपशी टक्कर देऊ शकतात. कारण तृणमूल काँग्रेस हा या राज्यातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. डावे पक्ष देखील इंडिया अलायन्सचे सदस्य असले तरी पश्चिम बंगालमध्ये आपापसात एकवाक्यता नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ममतांच्या तृणमूल काँग्रेसने 2011 मध्ये पश्चिम बंगालमधील डाव्यांची 34 वर्षे जुनी राजवट उलथवून टाकली होती. त्यामुळे भाजपला कमीत कमी मते मिळावीत आणि कोणाचीही मते एकमेकांमध्ये वाटली जाऊ नयेत यासाठी सर्वांनी मिळून एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करणे ही इंडिया आघाडीतील घटक पक्षांची धोरणात्मक खेळीही असू शकते. कारण अलीकडील काळात पश्चिम बंगालमधील भाजपचा वाढता प्रभाव हा तृणमूलसह सर्वच विरोधी पक्षांसाठी काळजीचा विषय ठरला आहे.
ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या 42 उमेदवारांच्या यादीत क्रिकेट जगतातील एका दिग्गजाचं नाव आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू युसूङ्ग पठाण याला तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. युसूङ्ग पठाणला बहरामपूर मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अधीर रंजन चौधरी हे सध्या तिथले विद्यमान खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसने यावेळी अभिनेत्री नुसरत जहाँचं तिकीट कापलं आहे. तिच्याऐवजी हाजी नुरुल इस्लाम यांना बशीरहाट लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात डोकावल्यास अटलबिहारी वाजपेयींच्या काळात एनडीएच्या सदस्य असताना ममता बॅनर्जी यांनीच पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विस्तार करण्यास मदत केली होती.
या राज्यातील भाजपाच्या काही खासदारांचा वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळातही समावेश करण्यात आला होता. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातही पश्चिम बंगालमधील भाजपचे अनेक खासदार मंत्री राहिले आहेत. ममतांच्या सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. सध्या चर्चेत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दाही या राज्यात गाजणार आहे. ममतादीदींनी त्याला यापूर्वीच विरोध दर्शवलेला आहे. पण भाजप सुरुवातीपासून ममतादीदींवर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालची यंदाची निवडणूक गतवेळीपेक्षा रंजक ठरणार हे निश्चित आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये निवडून येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहे. पण ममता बॅनर्जी या खंबीरपणे भाजपला सामोरे जाणार आहेत. मात्र त्या काँग्रेसला सोबत घेऊन लढल्या तर त्यांचा विजय काही प्रमाणात का होईना सोपा होऊ शकतो. कारण मतविभागणी हीच आजपर्यंतची भाजपची रणनीती राहिली आहे. त्यामुळे हे मतविभाजन टाळले तर भाजपाला पराभूत करणे इंडियासाठी फार अवघड जाणार नाही.