Supriya Sule Ajit Pawar – भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
महेश गायकवाड या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उठवत सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सुळे यांच्या मागणीनंतर त्यांच्याच पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांनी ही मागणी हाणून पाडत देवेंद्र फडणवीस यांचा बचाव केला आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्या गटाने भाजपला पाठिंबा देत सत्ताधारी बाकांवर उडी मारली आहे. शरद पवार ययांच्या गटाने मात्र विरोधकांची भूमिका स्वीकारली आहे.
अजित पवार गट म्हणतो… | Supriya Sule Ajit Pawar
अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर संताप व्यक्त केला आहे. “सुप्रिया सुळे या देशाच्या खासदार आहेत. कधीतरी देशाच्या प्रश्नावर बोलत चला. या घटनेमध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न कुठे येतो?
गृहमंत्र्यांनी आमदाराला गोळीबार करायला सांगितला होता का? घटनेची चौकशी होईल कारवाई होईल पण गृहमंत्री जबाबदार कसे?” असा प्रश्न उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तुम्हाला गृहमंत्री करायचे का? | Supriya Sule Ajit Pawar
उमेश पाटील यांनी यावेळी सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. “देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेऊन तुम्हाला गृहमंत्री करायचे का? मग हे सगळं थांबणार का? सुप्रिया सुळेंना गृहमंत्री केल्यावर राज्यातील गुन्हे थांबणार आहेत का? एकही अपराध घडणार नाही का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
देवेंद्र फडणवीस योग्य पद्धतीने काम करतायत | Supriya Sule Ajit Pawar
यावेळी उमेश पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची जोरदार पाठराखण केली. ते म्हणाले, ‘संबंधित आमदाराने व्यक्तिगत कारणाकरता काही केलं असेल. गोळीबार झालेला आपण पाहिलेला नाही. यामध्ये चौकशी होईल. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा संबंध येत नाही. राज्यात अनेक ठिकाणी वेगवगेळ्या घटना घडतात. त्यामुळे गृहमंत्र्यांना दिवसातून १०० वेळा राजीनामा द्यावा लागेल.’
‘कायदा आणि सुव्यवस्था राखणं नक्कीच गृहमंत्री यांची जबाबदारी आहे, ते योग्य पद्धतीने काम करतायत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात क्राईम रेट कमी झाला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी या घटनेच्या चौकशीची मागणी करावी. पण उठसुठ राजीनामा देण्याची, सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाते.’
इतर महत्वाच्या बातम्या
‘६ गोळ्या, ६ तासांचे ऑपरेशन अन् प्रकृती…’ गायकवाडांबाबत शिंदेंची मोठी अपडेट
‘गोळीबार, तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने…’ शरद पवार स्पष्टचं बोलले