नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ९० च्या दशकात काढण्यात आलेल्या श्रीराम रथयात्रेचे प्रमुख, माजी केंद्रिय मंत्री आणि तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मिडीया प्लॅटफाॅर्मवर पोस्ट करून याची घोषणा केली. भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय असल्याचे पंतप्रधानांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सहसा प्रजासत्ताक दिनाच्या आधी ’भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा केली जाते. त्यानुसार यावर्षी बिहारचे दिवंगत नेते कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार आधीच जाहीर झाला होता. आता नव्याने त्यात आडवाणींच्या नावाची भर पडली आहे. प्रजासत्ताक दिनानंतर हा पुरस्कार जाहीर करण्याचे औचित्य काय, असा प्रश्न विरोधक आता उपस्थित करत आहेत.
पंतप्रधान मोदींनी यावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आडवाणी हे सर्वात महान आणि आदरणीय नेते आहेत. भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. तळागाळात काम करण्यापासून गृहमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री ते देशाचे उपपंतप्रधान म्हणून सेवा करण्यापर्यंत त्यांचे जीवनकार्य आपण सर्वांनी अनुभवले आहे. पण काम करत असतानाही त्यांनी स्वतःला इतरांपेक्षा वेगळे केले. त्यांचे संसदीय कार्य नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टींनी भरलेले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची, पाकिस्तान येथे एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद अडवाणी आणि आईचे नाव ग्यानी देवी आहे. त्यांचे वडील व्यवसायाने उद्योजक होते. आडवाणी यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल, कराची येथून झाले. यानंतर त्यांनी डीजी नॅशनल स्कूल, हैदराबाद (सध्याच्या पाकिस्तानातील), सिंधमध्ये प्रवेश घेतला.
फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबईत स्थायिक झाले. येथे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांच्या पत्नीचे नाव कमला अडवाणी आहे. त्यांच्या मुलाचे नाव जयंत आडवाणी आणि मुलीचे नाव प्रतिभा आडवाणी आहे.
अडवाणी यांनी २००२ ते २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. याआधी ते १९९८ ते २००४ दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) गृहमंत्री होते. भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. दहाव्या आणि १४ व्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका चोख बजावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१५ मध्ये, त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. लालकृष्ण आडवाणी ५ वेळा लोकसभेतून आणि ४ वेळा राज्यसभेतून खासदार राहिले आहेत. लालकृष्ण आडवाणी हे भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा अध्यक्षही राहिले आहेत.
रथयात्रेचे फलित…
वर्ष १९९२ मध्ये आडवाणी यांच्या नेतेपदात श्रीराम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातमधील सोरटी सोमनाथ ते अयोध्या अशी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या प्रक्रियेत या रथयात्रेचे मोठे योगदान राहिले. रथयात्रेमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा बहुतांश हिंदुत्त्ववादी संस्था आणि संघटना सामील झाल्या होत्या. या रथयात्रेने रामजन्मभूमीचा विषय देश-परदेशात गाजला. यावर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे लालकृष्ण आडवाणींसह अनेकांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना देशभर निर्माण झाली होती.
उल्लेखनीय कारकिर्द…
आडवाणी १९७० मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले.
आडवाणी हे चित्रपट समीक्षक राहिले आहेत. त्यांना चॉकलेटस, चित्रपट आणि क्रिकेटची खूप आवड आहे.
१९४७ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव झाले.
आडवाणींनी माय कंट्री, माय लाइफ नावाचे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले आहे.
सर्वांना आश्चर्याचा धक्का देत त्यांनी २०१३ मध्ये सर्व पदांचा राजीनामा दिला.
१९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यापासून त्यांनी सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्षपद भूषवले होते.
अडवाणींनी आतापर्यंत अर्धा डझनहून अधिक रथयात्रा काढल्या आहेत. त्यामध्ये ‘राम रथयात्रा’, ‘जनादेश यात्रा’, ‘सुवर्ण जयंती रथयात्रा’, ‘भारत उदय यात्रा’ आणि ‘भारत सुरक्षा यात्रा’ आणि ‘जनचेतना यात्रा’ प्रमुख आहेत.