Devendra Fadnavis : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले. यातील काही नेते अजित पवार गटाला पाठिंबा देत आहे, तर काही शरद पवार यांचे समर्थन करत आहे. मात्र जामिनानंतर तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक (Nawab Malik) कोणाला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यातच त्यांनी आज सभागृहात हजेरी लावत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून विविध मुद्दयांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यातच नवाब मलिक यांनी अधिवेशनासाठी आज सभागृहात हजेरी लावत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसणे पसंत केले. यावरून नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे म्हंटले जात आहे. मात्र अद्याप याबाबत नवाब मलिक यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, आता भाजपने नवाब मलिक यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी नवाब मलिक यांना युतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसं पत्र अजित पवार यांना पाठवलं आहे. ‘सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही…’, अशा स्पष्ट शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे. त्यांच्या या पत्रामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात….
“माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.”
सत्ता येते आणि जाते.
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
“सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे”,
“त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांनी मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.”