World Cup 2023 IND vs BAN Weather Report : एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी हवामानामुळे सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. या स्पर्धेतील टीम इंडियाचा चौथा सामना पुण्यात बांगलादेशसोबत होणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी पुण्यात पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता आहे आणि हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास टीम इंडियाचे सलग चौथ्या विजयाचे स्वप्न धूळीस मिळू शकते. भारतीय संघाने आतापर्यंत सलग तीन सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर भारताने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव केला आहे.
भारताचे सलग चौथा विजय आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर लक्ष आहे. मात्र, पावसामुळे भारताचा खेळ बिघडू शकतो. भारत वि. बांगलादेश हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या स्थितीत भारताला एका गुणाचे नुकसान होऊ शकते, कारण बांगलादेशविरुद्ध भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.
A bit of rain in Talegaon a day before the #INDvsBAN match at MCA stadium in Gahunje, Pune.. #Rain #punerain #cricket #worldvup @ICC pic.twitter.com/K2cd86mEp0
— Janhavee Moole (@janhavee) October 18, 2023
एक गुण कमी झाल्यास भारताचे उपांत्य फेरीत पोहचण्याचे गणितही बिघडू शकते. साखळी फेरी संपल्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. बांगलादेशविरुद्ध एक गुण गमावल्यास येथेही भारताचे नुकसान होऊ शकते. मात्र, दिलासा देणारी बातमी म्हणजे या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना पावसामुळे रद्द झालेला नाही. सराव सामन्यांदरम्यान पावसामुळे अनेक सामने होऊ शकले नाहीत, मात्र साखळी टप्प्यातील सर्व सामन्यांचे निकाल समोर आले आहेत.
टीम इंडियाने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर आजपर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने 4 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. या मैदानावर भारत आणि बांगलादेश वनडे फॉरमॅटमध्ये आमनेसामने आलेले नाहीत. टीम इंडियाने आपला शेवटचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 2 वर्षांपूर्वी मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता, जो टीम इंडियाने 7 धावांनी जिंकला होता.
एमसीएवर पहिल्या डावात सरासरी 307 धावा झाल्या आहेत. त्याचवेळी दुसऱ्या डावातील सरासरी स्कोअर 281 आहे. मैदानात सर्वोच्च धावसंख्या 356 आहे, जी भारताने इंग्लंडविरुद्ध केली होती. नाणेफेक जिंकणारा संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो. या मैदानावरील भारत वि. बांगलादेश हा आठवा वनडे सामना असेल.