Bachhu Kadu : जीएसटी विभागाने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली आहे. सुमारे १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्यावरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनीदेखील या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे.
अमरावतीत माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी याविषयी बोलताना “पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं” असा थेट दावाच करून टाकला आहे.
दरम्यान, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात या कारखान्यावर छापेमारी केली होती. त्यावेळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचं समोर आले होते.
या प्रकरणी जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस पाठवली होती. रविवारी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे.