Asian Games 2023 Cricket Final India vs Sri Lanka Women : आज 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा अंतिम फेरीत श्रीलंकेशी सामना झाला. हा सामना जिंकून टीम इंडियाने प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.तर कांस्यपदकाच्या लढतीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
भारताने पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने गतविजेत्या पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
हँगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने 20 षटकांत सात गडी गमावून 116 धावा केल्या. स्मृती मंधानाने 45 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर जेमिमाह रॉड्रिग्जने 40 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त शेफाली वर्माने 15 चेंडूत नऊ धावा, रिचा घोषनं नऊ धावा तर दोन सामन्यांच्या बंदीनंतर संघात पुनरागमन करणारी कर्णधार हरमनप्रीत कौर हीनं दोन आणि पूजा वस्त्राकर हीनं दोन धावा केल्या.
श्रीलंकेकडून गोलंदाजीत उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी आणि इनोका रणवीराने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात 117 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 97 धावाच करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने अंतिम सामना 19 धावांनी जिंकला.
श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताच्या तितास साधू हिने हीनं गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत अवघ्या 14 धावांत श्रीलंकेचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले होते. तितास साधूने चामरी अटापट्टू (12), अनुष्का संजीवनी (1) आणि विश्मी गुणरत्ने (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी चौथ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली,मात्र पूजाने निलाक्षीला (23) बाद करून ही भागीदारी तोडली. राजेश्वरीने हसिनीला (25) बाद केले. दीप्तीने ओशादी रणसिंघे (19), देविका वैद्यने कविशा दिलहरी (5) याला बाद केले आणि राजेश्वरीने सुगंधिका कुमारीला बाद करत श्रीलंकेच्या आशा संपुष्टात आणल्या.
भारताकडून गोलंदाजीत तितास साधू हिने चार षटकार अवघ्या सहा धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडले. साधू हिने एक षटक निर्धावही फेकले. राजेश्वरी गायकवाड हिने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैदय यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.