आठ महिन्यांची भटकंती संपवून घरी : मेंढ्यांच्या जिवावर वर्षभराची रोजीरोटी
यवत – दौंड तालुक्यात सलग दोन दिवस पावसाच्या सरीवर सरी बरसत आहे. परतीचा पाऊस सुरू झाल्याने यवत भागात आता मेंढपाळ परतीच्या मार्गाने जाताना दिसत आहेत.
दीपावलीनंतर मेंढपाळ चाऱ्याच्या शोधात घरदार सोडून इतर तालुक्यात जिल्ह्यात जातात. मेंढ्यांना आठ महिने खाद्य उपलब्ध होईल, या आशेवर तो रानोमाळ भटकंती करतो. एका कळपात जास्तीत जास्त शंभरांपेक्षा जास्त मेंढ्या सांभाळल्या जातात.
एका ठिकाणी जर चारा उपलब्ध झाला आणि पती मेंढपाळ असेल, तर पत्नी दररोज वेगवेगळ्या ठिकाणच्या मुक्कामाची व्यवस्था करते. त्यासाठी घोडा हे साधन वापरले जाते. घोड्यावर मुक्कामासाठी तंबू, कोंबड्यासाठी खुराडे, संसारोपयोगी वस्तूची वाहतूक त्यांच्याकडे असणाऱ्या घोड्यावरून केली जाते.
एक कुटुंब म्हणजे एक पती- पत्नी त्यांची मुले आठ महिने या गावावरून त्या गावात भटकंती करत मेंढपाळ व्यवसाय करताना दिसतात. सध्या दौंड तालुक्यातून परतीच्या मार्गावर जाणारे मेंढपाळ दिसू लागले आहेत. दौंड तालुक्यासह शेजारील जिल्ह्यात तसेच तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने गावाबाहेर, माळरानावर, रस्त्याने असे मेंढपाळांचे कळप दिसू
लागले आहेत.
एक हजार रुपये दर
जेथे-जेथे मेंढ्यांसाठी चारा सापडेल, त्या शेतशिवारात मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत असतात. काही शेतकरी शेतात लेंडीखत आणि मूत्र मिळावे म्हणून एका रात्रीचे आठशे ते एक हजार रुपये देऊन शेतात मेंढ्या बसवितात. रासायनिक खताच्या वापरापेक्षा मेंढ्यांचे हे खत शेतीसाठी उपयुक्त असते. अनेक ठिकाणी मेंढ्या बसविल्यानंतर किंवा ज्या परिसरात नांगरणी केली आहे, अशा ठिकाणांहून मेंढपाळ मुक्काम हलवून दुसऱ्या गावातील शेतीशिवारात स्थलांतर करतात.आठ दिवस, 15 दिवस, कधी महिन्याभरात मेंढपाळांना दुसऱ्या गावात स्थलांतर करावे लागते.