वाल्हे – यावर्षी लांबणीवर गेलेला पाऊस श्रावणात देखील सरी न कोसळता अक्षरशः पाण्याचे तुषार आकाशातून पडत होते. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण होते. यातच, शनिवार (दि. 23) वातवारणातील वाढलेला उकाडा, ढगांनी केलेली गर्दी यातून वाल्हे (ता.पुरंदर) परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले. पाच दिवसांच्या गणपती आणि गौरांई विसर्जनाच्या दिवशी तसेच रविवारी (दि. 24) ही पावसाने हजेरी लागल्याने शेतकरीवर्ग काही प्रमाणात सुखावला आहे.
पावसाळा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने, शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत होती. श्रावणातील सरींचा अनुभव सुद्धा घेता आला नाही. गणपतीच्या आगमनाने पावसाची सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच पावसाने सुरूवात केल्याने मातीत ओलावा आल्याने परिसरात चैतन्य खुलले आहे.
रविवारीही (दि. 24) दुपारी पावसाने परिसरात सर्वत्र हजेरी लावल्याने खरीप हंगामातील काही पिकांना जीवदान मिळणार असून अद्यापही येथील शेतकरीवर्ग जोरदार पाऊसांच्या प्रतिक्षेतच आहेत. यावर्षी, दडी मारून बसलेल्या पावसाने उशिरा का होईना, परिसरातील सर्वदूर भागात, दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे.
यामुळे, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, मुसळधार पाऊसाची गरज भासत असून, अद्यापही ओढे- नाले, बंधारे कोरडेठाक आहेत. ओढ्यांना अद्याप पूर न गेल्यामुळे, लहान-मोठे प्रकल्प तहानलेले आहेत. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
हा पाऊस उसासाठी फायदेशीर
या हंगामातील पिके पाण्याअभावी धोक्यात असताना सलग दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आशेचा किरण दिसू लागले आहे. बाजरी पिकाला या पावसाने नवसंजीवनी मिळणार आहे. त्यातून बाजरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पण काढणीला आलेले बाजरीच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा पाऊस उसासाठी चांगला झाल्याचे अनेक शेतकरी बोलू लागले आहेत.