अमरावती – या देशावर ज्यांनी आक्रमण केले, ते संपले. पण हिंदू धर्म कधी संपला नाही. कुणाच्या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्ट करू शकेल. द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन जर हिंदू धर्म संपविण्याची भाषा बोलत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेते राजपाल यादव, खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, हिंदू धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचे वडील एम. के. स्टॅलिन यांच्या बाजूला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसतात. ते आता कुणाच्या सोबत आहेत, हे लोकांना कळले आहे. त्यांना आता नक्कीच घरी पाठवावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच भगवान श्रीकृष्ण हे तर अमरावती जिल्ह्याचे जावई आहेत. त्यांच्या जन्मोत्सवात आम्ही विकासाचा, प्रेमाचा काला घेऊन आलो आहोत. गेल्या सत्तर वर्षांत जितका निधी अमरावती जिल्ह्याला मिळाला नाही, तेवढा निधी आमच्या सत्ताकाळात मिळाला. अमरावतीतील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ विकास, मेगा टेक्सटाईल पार्क, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विद्यापीठ, रिद्धपुरात मराठी भाषा विद्यापीठ, रस्त्यांची दोन हजार कोटी रुपयांची कामे हा विकासाचा ओघ असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
“इंडिया’ माता म्हणणार का?
जरी काही लोकांनी हनुमान चालिसा म्हणण्यासाठी नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले. पण त्यांना काही लाभ झाला नाही. परंतू या देशात केवळ भगवान राम चालतील, हनुमानजी चालतील अन् छत्रपती शिवाजी महाराज चालतील. भारत माता की जय असा जयघोष केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, भारत माता म्हणण्यास किती चांगले वाटते. इंडिया माता म्हणणे मनाला चांगल वाटते का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.