पुसेगाव -लाखो रुपये खर्चून स्थानिक शेतकऱ्यांनी नेर तलावातून शेतीसाठी पाणी नेले आहे. सध्याची पावसाची परिस्थिती पाहता नेर तलावामध्ये जिहे- कटापूरचे पाणी आवर्तन सुरू केले आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य वाढत चालले आहे. अशा स्थितीत प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज कनेक्शन तोडून नेर धरणाचे पाणी नदीला सोडण्याचा घाट घातला आहे. प्रशासनाच्या या अन्यायी भुमिकेबाबत आज नेर तलाव परिसरातील विविध गावांनी पाणी न सोडू देण्याचा निर्धार केला व पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाला रोखले. आधी आमची कनेक्शन जोडा व धरण पूर्ण भरल्यानंतर पाणी सोडा अशी मागणी करण्यात आली.
नेर (ता. खटाव) या धरणामध्ये गेल्या दोन दिवसापासून जिहे- कटापूर योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे. नेर तलावामध्ये अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. नेर तलाव येथील स्थानिक अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना लाखो रुपये खर्चून कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार 30 टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना येरळा नदीला पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे व महसूल विभागाने केले असल्याने नेर तलावामध्ये पाणी शिल्लक राहणार नाही.
नेर तलावातून नेर, ललगुण, नागनाथवाडी, वर्धनगड, पवारवाडी, बुध व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाची कायदेशीर परवानगी घेऊन बॅंक कर्ज काढून दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत पाईपलाईन केले आहे. त्या पाईपलाईनच्या आधारे शेतकऱ्यांनी लाखो रुपये भांडवल घालून आले, ऊस पिकाच्या लागवडी केल्या आहेत.
सद्यपरिस्थितीत पावसाचे प्रमाण अतिशय चिंताजनक असून शेतकऱ्यांची पिके नेर धरणातील पाईपलाईनच्या आधारावर जीवित आहेत. असे असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा कोणतेही कायदेशीर नोटीस न देता मोटारीची वीज कनेक्शन तोडली आहेत. अशा परिस्थितीत पिकांची अवस्था पाहता लाखो रुपयांच्या पिकाचे नुकसान होऊ शकते. असे नुकसान झाले तर एखाद्या शेतकऱ्यांची जीवितहानी होऊ शकते आणि असा प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
सद्यपरिस्थितीत जिहे कटापूर योजनेचे आवर्तन नेर तलावामध्ये सोडण्यात आले असून, शेतकऱ्यांची मोटर कनेक्शन ताबडतोब जोडण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नेर धरण परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
=============================