सातारा – जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या साडेसहा हजार रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाचा गणेशोत्सव सर्वानी शांततेत पार पाडून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
येथील शिवतेज हॉलमध्ये शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलीस दलाची बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय देवकर उपस्थित होते. बैठकीनंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देसाई म्हणाले, “”गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. जिल्हा पोलिस दलाने त्या अनुषंगाने पूर्वतयारी केली आहे.
उत्सव शांततेच्या मार्गाने होईल यासाठी सूचना केल्या आहेत. शेवटचे चार दिवस स्पीकर, डेकोरेशन परवानगी देण्याचे काम होईल. राज्यस्तरावर लागू नियमावलीप्रमाणे गणेशोत्सव साजरा होईल. गणेशोत्सव शांततेत, धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. गुंड टोळ्यांना पुढे आणत काही प्रवृत्ती काम करतात. त्याला आळा घालण्याचे काम सुरू केले आहे. सायबर सेल आधुनिक करण्यावर भर दिला असून जिल्हा नियोजनमधून निधी दिला जाईल. गोपनीय माहिती बाहेर जाणार नाही यासाठी अत्याधुनिक करणार आहे.
सायबर सेल महत्वाचा घटक आहे.” काही गुन्ह्यात वेगळ्या पद्धतीने सायबरचा वापर केला आहे. मात्र, सायबर सेलचे आधुनिकीकरण व पोलीस प्रशिक्षण ही प्रक्रिया जिल्ह्यातच पार पाडली जाईल याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करून त्याला डीपीसीतून निधी दिला जाईल. याबाबत पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्याचे देसाई यांनी सांगितले.पोलिस दलाचे कामकाज समाधानकारक आहे, असे सांगून देसाई म्हणाले, “”समाजात तेढ निर्माण होणार नाही याचे काम पोलिसांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात साडेसहा हजार लोकांना तडीपार केले जाणार आहे. याची कारवाई प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. राज्यातील नियमानुसार डॉल्बीला परवानगी दिली जाईल. या सहा महिन्यांत अवैध हत्यार वापरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे गणेशमूर्तीची उंची राहील. खड्डे मुजवण्याच्या सूचना नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत. मुरूम टाकणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्याना देण्यात येतील. राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी गणेशोत्सवापूर्वी बैठक होणार असून खड्डे मुजवण्याच्या सूचना दिल्या जातील.”
साताऱ्याची काळजी रोहित पवारांनी करू नये
दुष्काळग्रस्त माण खटाव तालुक्यात पालकमंत्री किती वेळा आले अशी टीका आमदार रोहित पवार यांनी सातारा दौऱ्यात केली होती . त्या टीकेचा समाचार शंभूराज देसाई घेताना म्हणाले रोहित पवार बऱ्याच कालावधीनंतर पाहुणे कलाकार म्हणून येथे आले होते . माण तालुक्याच्या टंचाई निवारणाची बैठक आम्ही यापूर्वीच घेतली आहे . मागणी आली की तत्काळ टॅंकर सुरु करण्याचे आदेश प्रांतांना दिले आहेत . पावसाची दडी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन सर्व पालकमंत्र्यांना या टंचाईच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत . सातारा जिल्ह्याच्या धरणात % पाणीसाठा आहे . पिकांसाठी गरजेनुसार पाण्यांचे दुहेरी आवर्तन केले जाणार आहे . या उपाय योजनांची पवार यांना माहिती नसावी त्यांनी साताऱ्याची फार काळजी न करता स्वतःच्या मतदारसंघाची काळजी घ्यावी असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला.